ठाणे : शिवाईनगर येथील पाण्याने भरलेल्या खड्डय़ात पोहण्यासाठी गेलेल्या अभिषेक शर्मा (११) आणि कृष्णा गौड (११) या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ते दोघेही शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. त्यांचे मृतदेह रविवारी सापडले.

उपवन येथील रामबाग परिसरात अभिषेक आणि कृष्णा राहत होते. शनिवारी सायंकाळपासून ते बेपत्ता होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून वर्तकनगर पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तसेच दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

रविवारी सकाळी काही नागरिकांना अभिषेक आणि कृष्णा या दोघांचे मृतदेह शिवाईनगर येथील पाण्याने भरलेल्या खड्डय़ात तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह खड्डय़ातून बाहेर काढले.

याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले असावेत आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.