ठाणे : समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी मलनिस्सारण केंद्र येथे कार्यान्वित असणाऱ्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची ‘युनिसेफ’ या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून दखल घेण्यात आली आहे. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त संस्थेकडून ठाण्यातील या प्रकल्पाला अभिनव प्रकल्प जाहीर करत प्रकल्पाचे छायाचित्र आणि सविस्तर लेख संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथील मलनिस्सारण केंद्र येथे हरित कचऱ्यापासून इंधननिर्मिती, निर्माल्यापासून खतनिर्मिती आणि सुका कचरा व्यवस्थापन असे तीन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या ठिकाणी प्रति दिन ३० टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येते. कचरा व्यवस्थापन प्रकल्पाबरोबरच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे, प्लास्टिकपासून इंधननिर्मिती करणे, औषधी वनस्पतींची लागवड, निर्माल्यापासून खतनिर्मिती, हरित कचऱ्यापासून कोळसानिर्मिती यांसारख्या वैशिष्टय़पूर्ण प्रकल्पांचादेखील यात समावेश आहे.कचरा वर्गीकरण आणि त्यातील विविध पर्याय नागरिकांना समजून सांगण्यासाठी या ठिकाणांची व्यवस्था एका पर्यटन केंद्रासारखी करण्यात आली आहे. नागरिकांना कचरा व्यवस्थापनाविषयी माहिती मिळावी आणि कचरामुक्त शहर या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी समर्थ भारत व्यासपीठातर्फे ‘रिसायकल अर्थ’ या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे सुमारे १ लाख नागरिक या प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. तसेच या प्रकल्पामध्ये वर्गीकरण तसेच विल्हेवाट लावणे यांसारखी कामे केली जातात. वर्षांकाठी जवळपास १० हजार टन कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जाते. या कामामुळे २७ कचरावेचक महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. या कचरावेचक महिलांना प्रति महिना १० हजार रुपये मानधन देण्यात येते. तसेच या प्रकल्पाला आतापर्यंत जिल्ह्यातील विविध शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांनी भेटही दिली आहे. एकंदरीत या प्रकल्पाचे स्वरूप पाहता जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत युनिसेफकडून या प्रकल्पाला अभिनव प्रकल्प म्हणून गौरवित करण्यात आले आहे.शहरात कचराभूमी नसावी, शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यस्थापन व्हावे या हेतूने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये आतापर्यंत हजारो ठाणेकर यात जोडले गेले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होत आहे. तसेच यातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच रोजगारनिर्मितीदेखील होत आहे. येत्या काळात हा प्रकल्प पाच लाख कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.-उल्हास कार्ले, संचालक, समर्थ भारत व्यासपीठ