वडाळा ते कासारवडवली या 'मेट्रो मार्ग ४ च्या प्रकल्पाचे काम ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहाणी दौऱ्यादरम्यान दिले. तसेच मेट्रोमुळे ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पाची नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. मॉडेल चेकनाका येथून शिंदे यांनी दौऱ्याला सुरुवात केली. या भागात मेट्रोचे काम किती टक्के पूर्ण झाले आहे, याचा आढावा घेत उर्वरित कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिले. या मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंतची मुदत आहे. या मुदतीत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्ह्यात मेट्रोचे जाळे तयार करण्याचे काम सुरू असून यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण,अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे मेट्रोच्या माध्यमातून एकमेकांना जोडली जाणार आहेत,या असेही त्यांनी सांगितले. मुंबई- नाशिक महामार्गावरील तीन हात नाका भागात विद्युत कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला असून यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे हे काम तातडीने पूर्ण करून खड्डा बुजविण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले