ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच स्टेम प्राधिकरणाच्या योजनेमधील अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे, कळवा आणि मुंब्रा येथील काही भागातील पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद करण्यात येणार आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. ठाणे महापालिकेच्या महामार्गालगत जलवाहिनीमधील गळती दुरुस्त करणे, साकेत पुलावरील मुख्य जलवाहिनीवर यंत्रणा बसविणे, वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात नव्याने टाकण्यात आलेल्या १ हजार १६८ मीमी जलवाहिन्या मुख्य जलवाहिनीला जोडणे, पाणीपुरवठ्यामधील दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची अत्यावश्यक कामे करणे तसेच स्टेम प्राधिकरणाकडून त्यांच्या योजनेमधील जलवाहिन्यांची दैनंदिन निगा व देखभाल व दुरूस्तीची आवश्यक कामे करण्यात येणार आहे. हेही वाचा >>> डोंबिवलीत लोढा पलावा येथे १५ लाखाचे सोन्याचे दागिने चोरणारी अटक ठाणे महापालिकेने शहरात बुधवारी २४ तास पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी ९ ते गुरूवारी सकाळी ९ वाजतापर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, कारागृह परिसर, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर,सिद्धेश्वर तलाव, इटर्निटी, जॉन्सन कंपनी परिसर, मुंब्रा व कळव्यातील काही भाग येथे २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहील, असे ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचेही विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.