कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदीकाठच्या चार जलशुद्धीकरण केंद्रामध्ये येत्या मंगळवारी देखभाल, दुरुस्ती, यांत्रिकी, विद्युत कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली. डोंबिवली, कल्याण, टिटवाळा शहरांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशु्द्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. नेतिवली केंद्रातून डोंबिवली शहराला, टिटवाळा केंद्रातून टिटवाळा, मांडा भागाला पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित केंद्रांमधून कल्याण पूर्व, पश्चिम भागाला पाणीपुरवठा केला जातो. दररोज या केंद्रांमधून ३४० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा शहरांना केला जातो. पाऊस सुरू झाल्यानंतर या केंद्रांमध्ये तांत्रिक, विद्युत बिघाड झाल्यानंतर पालिकेला या ठिकाणी काम करणे अवघड जाते. त्यामुळे तातडीने ही कामे हाती घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.