कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने शुक्रवारी (ता.१३) डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी सांगितले. डोंबिवली शहराला नेतिवली येथील १५० दशलक्ष लीटर पाणी योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल आणि दुरुस्तीचे काम करायचे असल्याने शुक्रवारी या योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. दुरुस्तीच्या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी साठवून ठेवावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.