कल्याण – कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा परिसरातील गावांचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता. १३) आठ तास बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. या आठ तासाच्या पाणी पुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घुडे यांनी केले आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेचे उल्हास नदी काठी मोहिली येथे १०० दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र आणि मोहिली उदंचन केंद्र आहे. या दोन्ही पाणी पुरवठा केंद्रांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या २२ केव्ही एनआरसी कंपनी दोन वीजवाहकावरून (फिडर) विद्युत पुरवठा केला जातो. महावितरण कंपनीला एनआरसी दोन येथील वीजवाहकाच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (ता.१३ मे) रोजी करायचे आहे. हे काम महावितरण कंपनीच्या अभियंता, ठेकेदाराकडून सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत केले जाणार आहे. हे काम दिलेल्या वेळेपेक्षा अगोदरही पूर्ण करण्याचा मानस महावितरणच्या अभियंत्यांचा आहे. पण काही तांत्रिक अडचणी विचारात घेऊन या कामासाठी पाचची अंतिम वेळ निश्चित करण्यात आली आहे.
मोहिली येथून पत्रीपुलाजवळील नेतिवली टेकडीवरील १०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुध्दीकरण केंद्राला व १०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या मोहिली जलशुध्दीकरण केंद्राला पाणी पुरवठा केला जातो. नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रातून डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेत आणि कल्याण पूर्वच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जातो. नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र मंगळवारी बंद राहणार असल्याने डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
तसेच, मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण पश्चिम परिसर, टिटवाळा, मांडा, शहाड, आ्ंबिवली, अटाळी, मोहने, जेतवननगर, माण अटाळी परिसरातील पाणी पुरवठा केला जातो. मोहिली जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार असल्याने कल्याण पश्चिम, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा मंगळावारी बंद राहणार आहे, असे कार्यकारी अभियंता अशोक घुडे यांनी सांगितले.