ठाणे : पतीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून गीता यादव (३६) या महिलेने उकळते तूप मनीषा पांडे (३०) यांच्या अंगावर ओतून त्यांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. मनीषा यांचा मृत्यू झाल्याने मंगळवारी त्यांच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमान्यनगर येथील पाडा क्रमांक चार भागात मनीषा या त्यांच्या तीन मुलांसोबत वास्तव्यास होत्या. ज्ञानेश्वरनगर भागात गीता ही तिच्या पतीबरोबर राहते. मनीषा आणि गीताच्या पतीची एकमेकांशी ओळख होती. पतीचे मनीषाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय गीताला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होत असत. २३ जानेवारीला मनीषा कामानिमित्ताने त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. त्याचवेळी अचानक गीताने मनीषा यांना मोबाइलद्वारे संपर्क साधला. तसेच त्यांना जेवण बनविण्यासाठी घरी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे मनीषा त्यांच्या लोकमान्यनगर येथील घरी पोहचल्या. घरामध्ये जेवण बनवत असताना गीताने उकळते तूप मनीषा यांच्या अंगावर ओतले. या घटनेत मनीषा गंभीर जखमी झाल्या. स्थानिक रहिवाशांनी त्यांना तात्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल केले. ६ मार्चला उपचारादरम्यान मनीषा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मनीषा यांच्या आईने मंगळवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीताला अद्याप अटक झालेली नाही.