डोंबिवली- चुलतीशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून चुलत सासऱ्यासह तीन जणांनी एका तरुणावर रस्त्यावर हल्ला केल्याची कल्याण-बदलापूर रस्त्यावरील खोणी गावातील एका ढाब्या समोर घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जखमी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमलेश पावशे, केशव संते (रा. कडलक, खोणी) आणि एका अज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. जितेश भगवान भोईर (२७, रा. पोसरी, खोणी) हा तरुण हल्ल्यात जखमी झाला आहे. पोलिसांनी सांगितले, जितेश हा कल्याण तालुक्यातील खोणी गावात राहतो. त्याचे याच गावात राहणाऱ्या आरोपी कमलेश याच्या चुलतीशी काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. या प्रेमविवाह प्रकरणातून पावशे, भोईर गटात वाद झाले होते. तो वाद धुमसत होता. जितेश आपली कार घेऊन खोणी गावाच्या हद्दीत असलेल्या एका सर्व्हिस सेंटरवर वाहन देखभालीसाठी घेऊन गेला होता. हीच संधी साधून आरोपी कमलेश पावशे आणि त्याच्या दोन साथीदारांनी जितेशला निसर्ग ढाब्याजवळ गाठून त्याच्यावर  लाकडी दांडक्याने, पाईपने जीवघेणा हल्ला केला. त्याला बेदम मारहाण करून पळून गेले. या हल्ल्यात जितेशला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर  खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस उपनिरीक्षक पी. बी. गायकवाड अधिक तपास करीत आहेत.