आयरे गावात मंगळवारी भर दिवसा एका तरुणाची हत्या झाली. विक्रांत ऊर्फ बाळू केणे (२६) असे या तरुणाचे नाव असून, तो युवा सेनेचा पदाधिकारी आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असला तरी रस्त्यात उभी असलेली गाडी बाजूला घेण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विक्रांत हा डोंबिवली येथील आयरे गावात राहत होता. मंगळवारी दुपारी याच गावात तो कारने जात होता. या रस्त्याच्या मधोमध जेसीबी उभा असल्याने त्याला कार पुढे नेणे शक्य होत नव्हते. परिसरातील एका खासगी कामासाठी जेसीबी आणण्यात आला होता. त्यामुळे त्याने मंगेश भगत या तरुणास जेसीबी बाजूला काढण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. मात्र, या वादाच्या रागातून मंगेशने काही साथीदारांसह विक्रांतचे घर गाठले. तिथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. या वादातून मंगेशने विक्रांतवर गोळी झाडली. त्यात विक्रांतचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मंगेशसह त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला. विक्रांतचा मित्र वरुण शेट्टी याने हा सर्व प्रकार पाहिला असून, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी सांगितले.