ठाणे जिल्ह्य़ातील करोनास्थिती पूर्णपणे नियंत्रणात, रुग्णसंख्येत मोठी घट ठाणे : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसाच्या कालावधीत ठाणे महापालिका क्षेत्रात करोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्यामुळे आरोग्य यंत्रणांचा भार कमी झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये प्रतिदिन आढळून येणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ांनंतर करोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. असे असले तरी कमी होणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यातील करोना मृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणांपुढील चिंता कायम होती. करोना प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतली नाही त्यांचा आणि तसेच सह्व्याधी असणाऱ्या रुग्णांचा मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये समावेश होता. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यास जिल्ह्यात प्रतिदिन पाच ते सहा रुग्णांचा करोनामुळे मृत्यू होत असल्याचे दिसून आले होते. कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई पालिका क्षेत्रातील रुग्णांचा यामध्ये अधिक संख्येने समावेश होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही महापालिका क्षेत्रातील मृत्युदर स्थिरावला आहे. तर ठाणे महापालिका क्षेत्रात मागील पंधरा दिवसांमध्ये एक ही करोना मृत्यूची नोंद झाली नसल्याची सकारात्मक बाब जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या दैनंदिन करोना रुग्णसंख्येचे अहवालातून समोर आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण सक्रिय करोना रुग्णांची संख्या ही २९३ इतकी आहे. तर यापैकी २५० रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले. कल्याण-डोंबिवलीतही करोना मृत्यूत घट जिल्ह्यात करोनाच्या तिसऱ्या लाटे दरम्यान कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. मागील महिन्यात कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रतिदिन दोन ते तीन रुग्णांचा मृत्यू होत असल्याची बाब समोर आली होती. सद्यस्थितीत कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील रुग्ण मृत्यूचे प्रमाण कमी झाली असून मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत सात बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.