पहिला पाऊस पडला की, मातीचा गंध आपल्याला धुंद करून जातो, सुखावून जातो. कुठल्याही अत्तराच्या कुपीत नसलेला हा सुगंध कसा तयार होतो, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल पण उत्तर मात्र मिळाले नसेल. माती वरून कोरडी दिसत असली तरी आत थोडा ओलावा असतो. त्यात असिनोमायसेटिस नावाचे जीवाणू वेटोळी करून राहात असतात. जेव्हा जमीन वाळते तेव्हा या जीवाणूमुळे मातीचे स्पोअर्स (बीजूक) तयार होतात. जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा असिटिनोमायसेटिसच्या जीवाणूंचे स्पोअर्स हवेत उधळतात. पावसाच्या पाण्यातील बाष्प हे एरोसोलसारखे काम करतात. त्यामुळे एरोसोल थेट आपल्या नाकापर्यंत येतात, त्यामुळे भिजलेल्या मातीचा मृदगंध आपल्याला येतो व आपण हरखून जातो. या स्पोअर्समध्ये मातीचा सुवास असतो. हा जीवाणू जगभर आढळतो त्यामुळे पाऊस पडल्यानंतर गोडसर असा वास येतो. हे जीवाणू ओलाव्यात वाढतात. पावसाच्या आम्लतेमुळेही वेगळ्या प्रकारचा वास येतो. वातावरणातील रसायनांमुळे पावसाचे पाणी आम्लधर्मी बनते. हे पाणी मातीवर पडल्यानंतर या आम्लधर्मी पाण्याशी अभिक्रिया होते व सुवास तयार होतो. मातीतील खनिजे या पाण्याने सुटी होऊन त्यांची अभिक्रिया गॅसोलिनशी होते. त्यामुळे अतिशय वेगळा विचित्र वास येतो. बॅक्टेरिया स्पोअर्समुळे निर्माण झालेला वास हा मनाला प्रसन्नता देणारा असतो. पावसामुळे तिसऱ्या प्रकारचा वासही तयार होतो. वनस्पती व झाडे जे तेल सोडतात त्यामुळे हे तेल खडकावर व कडक भागावर पडते. ते सेंद्रिय व इतर रसायनांशी म्हणजे गॅसोलिनशी अभिक्रिया करते, हा गंधही जीवाणूंच्या स्पोअर्ससारखा आनंददायी व हरखून टाकणारा असतो.