बेताची आर्थिक परिस्थिती, पत्रकार वडिलांनी रुजविलेले संस्कार आणि विदेशातील वास्तव्यात करिअरला मिळालेली कलाटणी. २००१ पासून ‘इरॉस इंटरनॅशनल’मध्ये कार्यरत. लंडनच्या भांडवली बाजारात कंपनीची सूचिबद्धता होण्यात महत्त्वाचा वाटा आणि  मुंबई, राष्ट्रीय शेअर बाजार व न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेन्जमध्येही नोंदणी, असं उत्तुंग कर्तृत्व! असा सारा एखाद्या चित्रपटात चपखल बसेल असा ‘इरॉस इंटरनॅशनल’च्या सीईओ आणि एमडी ज्योती देशपांडे यांचा प्रवास..

थिएटरमधल्या सिनेमाचा पडदा प्रकाशमान होतो.. नामावली येऊ लागतात.. त्यातलंच एक नावं असतं, इरॉस इंटरनॅशनल.. ‘बाजीराव-मस्तानी’, ‘बजरंगी भाईजान’, ‘बदलापूर’, ‘एनएच १०’, ‘तनू  वेड्स मनु रिटर्न..’ अशा ३,००० हून अधिक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ‘इरॉस इंटरनॅशनल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक ज्योती देशपांडे.. त्यांचा इथवरचा प्रवास अनेक कंपन्यांमधून, अनेक पदांवरून खणखणीतपणे पुढे चालू राहिलेला..
ज्योती यांचा जन्म १९७० च्या डिसेंबरचा. आई गृहिणी तर वडील पत्रकार. घरची परिस्थिती जेमतेमच. लहानपणापासून शिक्षण होईपर्यंत सगळं मुंबईच. स्वत:विषयी सांगताना ज्योती ‘फ्लॅशबॅक’मध्ये जातात.. ‘‘सहा महिन्यांची असताना झालेलं इन्फेक्शन माझ्या  शरीरावर परिणाम करणारं ठरलं. पण लहानाची मोठी होईपर्यंत मला कधीही मी इतरांपेक्षा वेगळी असल्याचं घरच्यांनी भासवूच दिलं नाही. इतर सर्व करतात ते सर्व काही मी करायचे. मग मैदानी खेळ असला तरी मला मागे ठेवलं गेलं नाही. मित्र असोत की कुटुंबातील व्यक्ती सर्वानी लहानपणापासूनच मला सहकार्य केलं. अर्थात घरची आर्थिक परिस्थिती यथातथाच, त्यामुळे आठवीत असल्यापासून शिकवण्या घ्याव्या लागल्या. माझ्याच उच्च शिक्षणासाठी मी पुंजी जमा करत होते. वडील
के. सुब्रमण्यम यांच्या संस्कारांचीही जोड होतीच. घरात खूप पुस्तकं असायची. थोरामोठय़ांची ते अगदी रामायण-महाभारतापर्यंत. वडील फक्त त्यातले काही परिच्छेद अधोरेखित करून ठेवायचे. म्हणायचे एवढंच वाच. पण त्यातील सार माझं आयुष्य घडविण्यात उपयोगी पडलं.’’

वाणिज्य व अर्थशास्त्रातल्या पदवीनंतर मुंबईतल्याच ‘एसपीजेआयएमआर’मधून ज्योती यांनी ‘एमबीए’ केलं. त्यालाच जाहिरात आणि माध्यम क्षेत्रातल्या पदवीचीही जोड दिली. त्या जोरावर सुरुवातीला मुंबईत काही ठिकाणी त्यांनी कामही केलं. अर्थात क्षेत्र जाहिरातीचंच. त्यांनी जाणूनबुजून मनोरंजन क्षेत्र निवडलं होतं. कारण वडिलांमुळे पत्रकारितेशी परिचय होताच. आणि जाहिरात क्षेत्रातलं प्राथमिक शिक्षणही त्यांनी घेतलं होतं. साहजिकच मनासारखं काम सुरू झालं. दरम्यान (१९९३) व्हीजेटीआयमधून इंजिनीअर झालेल्या संजय देशपांडे यांच्याशी लग्न झालं. दोन वर्षांनी इंग्लंडच्या दौऱ्यांच्या निमित्ताने एक सुवर्णसंधी त्यांच्या हाती आली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या, अनेक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ‘इरॉस इंटरनॅशनल’चं मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालकपदही..
अर्थात इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हताच. इरॉसमध्ये येण्यापूर्वी त्या ‘जे वॉल्टर थॉम्पसन इंडिया’ या जाहिरातीशी संबंधित कंपनीत होत्या. त्यानंतर त्यांनी यूकेतल्या ‘झी टेलिव्हिजन’च्या जाहिरात, विक्री आणि विपणन विभागातल्या लोकांना आपल्या कामाची दखल घ्यायला लावली. पुढे ब्रिटनमधल्याच आघाडीचा जाहिरात समूह असलेल्या डब्ल्यूपीपीच्या माईंडशेअरमध्ये त्यांनी वरिष्ठ माध्यम सल्लागार म्हणूनही काम पाहिलं.

युकेतलं वास्तव्य, तिथं आपल्याच क्षेत्राशी संबंधित काम करणं आणि करिअरचा टर्निग पॉईंटही गवसणं असं सारं काही ज्योती यांच्याबाबत घडत होतं. पण ते सातासमुद्रापार! त्याच दरम्यान, ९० च्या दशकात ‘बी४यू’ ही वाहिनी केवळ संगीत आणि मनोरंजन क्षेत्रासाठी अवतरली. तिच्या जन्मापासूनच्या सगळ्या प्रक्रियेत आणि केवळ यूकेतच नव्हे तर जगभरातलं तिचं दोन वर्षांचं संगोपन ज्योती यांनीच केलं. ‘झी’चे किशोर लुल्ला हे त्यांना येथेही मार्गदर्शक म्हणून लाभले. ‘बी४यू’च्या निवडक संस्थांपकांमध्ये हे दोघंही होते. सांगितिक विषयाला वाहिलेल्या माध्यमाचं, ‘बी४यू’चं अस्तित्व त्यांच्यामुळं निर्माण झालं. पुढं या वाहिनी वा कंपनीचं नातं इरॉसशी जुळलं आणि मग ज्योती यांना मोठी जबाबदारी मिळत गेली.

वर्षांतले सहा महिने ज्योती यांचं वास्तव्य भारताबाहेरच असतं. भारतात त्या असल्या की सुप्रीम चेंबर्समधल्या ‘त्यांच्या’ केबिनसमोर पूर्वनियोजित बैठकीसाठी आलेल्यांनी रिसेप्शन भरलेलं असतं. दोन दशकं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये महत्त्वाच्या पदावर वावरल्यानंतर आता सामाजिक कार्यामध्ये कार्यरत होण्याचा ज्योती यांचा मानस आहे. ‘‘आर्थिक, शारीरिकदृष्टय़ा दुर्बल वर्गासाठी काम करण्याची खूप इच्छा अनेक वर्षांपासून आहे. ती आता पूर्णत्वास न्यावी, असं वाटतंय.’’ ज्योती पुढली कारकीर्द काय असेल याबाबत सांगतात. त्यामागे ‘‘आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात एकाचं जीवनमान जरी उंचावू शकलो, त्याला समर्थ बनवू शकलो अथवा त्याच्यासाठी त्याला गरजेचं असं काही करू शकलो तरी ते खूप आहे. खरं समाधान त्यात आहे,’’ हे कारण त्या देतात.

मानाच्या मानल्या जाणाऱ्या फॉच्र्युन यादीतही ज्योती झळकल्या आहेत हे त्यांच्यासाठी कौतुकास्पद आहे. त्याचं कारण मात्र वेगळंच आहे. त्या म्हणतात, ‘‘आघाडीच्या बिझनेस वुमनकरिता फॉच्र्युन ५० च्या यादीत जेव्हा माझं नाव आलं तेव्हा फार काही वेगळं असं वाटलं नाही. पण याच स्त्रियांच्या यादीत जेव्हा माझ्याबरोबरीने माझ्या गुरू (गेस्ट प्रोफेसर)
चित्रा रामकृष्णही यांचाही समावेश होता हे पाहिल्यावर स्वत:बद्दल अभिमानच वाटला.

ज्योती यांचं कर्तृत्व : ज्योती देशपांडे २००१ पासून ‘इरॉस इंटरनॅशनल’मध्ये आहेत. कंपनीला प्रगतिपथावर नेऊन ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. लंडनच्या भांडवली बाजारात कंपनीची सूचिबद्धता होण्यात ज्योती यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याबाबतच्या त्यांच्या अनुभवानं पुढं कंपनीला
२०१० मध्ये मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार व पुढच्याच तीन वर्षांत न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेन्जमध्ये नोंदणी करता आली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध भाषा आणि त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाचं नवं अंगं याची जोड ‘इरॉस’ला मिळवून देण्यात ज्योती यांचं यश मोठं आहे. मोबाइल अथवा लॅपटॉप/कॉम्पुटरसारख्या ऑनलाइन मंचावर चित्रपट येणं  ‘गेम चेंजर’ आहे, असं त्या मानतात. माहिती तंत्रज्ञानाची वाट निवडून ‘इरॉस’ही त्या क्रांतीचा एक भाग बनत आहे, याविषयी त्या ठाम आहेत. इरॉस प्रदर्शित चित्रपट आणि संबंधित सेवांचं खास अ‍ॅपही आता उपलब्ध आहे.

इरॉसचं वैशिष्टय़ : गेल्या काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘बाजीराव-मस्तानी’ आणि गेल्या कालावधीतील अनेक चित्रपटांची निर्मिती ते वितरण अशी एकखांबी जबाबदारी ‘इरॉस इंटरनॅशनल’कडे आहे. ३,००० हून अधिक चित्रपटांचं वितरण, या क्षेत्रातील निम्म्याहून अधिक बाजारहिस्सा ही बिरुदंही कंपनीला लागली आहेत. मनोरंजन क्षेत्रात
स्वत:चा स्टुडिओ असलेली देशातील निर्मिती आणि वितरण क्षेत्रातील ‘इरॉस’ ही एकमेव कंपनी आहे. पाश्चिमात्य देशांबरोबरच आशियाई देशांमधील सर्वाधिक चित्रपट वितरणाचे हक्क कंपनीकडे आहेत. भारतात अनेक स्थानिक तसेच विशेषत: आशियाई देशांमध्ये विविध भाषांमध्ये चित्रपट झळकविण्याचं श्रेय ‘इरॉस’कडे जातं.

करिअरचा मूलमंत्र
आपण काय करू शकतो त्यावर लक्ष
केंद्रित करा आणि आपण जे काही चांगलं
करू शकतो ते नक्की करा. आपल्याला जे करायचं ते किती महत्त्वाचं आहे आणि ते आपण कसं करू शकतो, याची शिस्तबद्ध आखणी करा. तणाव जाणवू देऊ नका. व्यवसायात कोणताही व्यवहार करताना नेहमी पारदर्शकता राखा. समस्यांपासून
पळ न काढता त्या सोडविण्याचं धोरण बाळगा. सकारात्मक दृष्टिकोनानं खूप
काही सोप्पं होतं.

आयुष्याचा मूलमंत्र
सकारात्मक व्हा असं इथं सांगणं सोप्पं वाटेल. पण त्यासाठी तुम्हाला चहुबाजूंनी पाठिंबा असणंही खूप महत्त्वाचं ठरतं. वैयक्तिक आयुष्यातही दीर्घकालीन नातेसंबंध जोपासा. आयुष्यात ‘हार्ड वर्क’शिवाय पर्याय नाही आणि ‘शॉर्ट कट’ कधीही दीर्घकालीन फायद्याचा नसतो, हे लक्षात ठेवा. ध्यानधारणा आणि थोडंसं धार्मिक होणं तुम्हाला तुमच्या लक्ष्यावर स्थिर ठेवण्यास मदत करू शकतं. तुम्ही एकटेही सारं काही करू शकता, असा गैरसमजही करून घेऊ नका.

वीरेंद्र तळेगावकर
veerendra.talegaonkar@expressindia.com