खुल्या निसर्गात डोंगरभटकंतीत अनेकविध गोष्टी शिकायला मिळतात. पण डोंगरभटकंतीसारखाच कधीकधी डोंगरापर्यंतचा रस्त्यावरील प्रवासदेखील बरेच काही शिकवून जातो. वासोटय़ावरुन येताना असाच एक आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव मिळाला. वासोटा उतरल्यावर चोरवणे गावात छान आदरातिथ्य अनुभवल्यानंतर दुसरे दिवशी सकाळी आम्ही छान ताजेतवाने झालो होतो. माझा गुडघाही दुखायचा कमी झाला होता. एकंदरीत ट्रेक छानच झाला होता. पण अजूनही म्हणतात ना तशी, खाज कमी झाली नव्हती.
एसटीत बसलो तेव्हाही असे वाटत होते की एवढय़ा लवकर पुण्याला जायचे का? मध्यान्हीला चिपळूण स्थानकावर उतरलो. त्याचवेळी आम्हाला ‘गणपती पुळे’ असा बोर्ड दिसला. मी आणि माझा मित्र योगेश सहेतुक नजरेने एकमेकांकडे पाहताना आमचा आणखी एक मित्र अन्याने ते पाहिले आणि त्याने तातडीने ब्रेक लावला, ‘खबरदार, काहीतरी नवा प्लॅन केलात तर. मुकाटय़ाने पुण्याला जायचे.’ तरीही त्याला समजावले, ‘अरे, तिथे आपल्याला कुठे काय चढायचे नाहीये. आलोच आहोत तर गणपतीचे दर्शन घेऊ , समुद्रकिनारा पाहू.’ ही मात्रा लागू पडली.
संध्याकाळच्या सुमारास गणपतीपुळय़ाचे दर्शन घेऊन, समोर आलेल्या एसटीत जाऊन बसलो. योगेश आमचा कॅशियर, सगळे पैसे त्याच्याचकडे. कंडक्टर आल्यावर साहेबांनी खिशात हात घातला आणि शंभरची एकच नोट बाहेर आली. बाकी पैसे काय झाले? त्याला एकदम धसका बसला. एकच नोट हाताशी शिल्लक होती, बाकीचे पैसे सापडत नव्हते. मग त्याची सॅक, आमची सॅक सारे तपासले. शेवटी चिपळूणचे तिकीट काढले. काहीतरी गफलत झाली होती किंवा नोटा पडल्या होत्या. आता करायचे काय? चिल्लरसकट सगळे मिळून ३०-३५ रुपयेच होत होते. एवढय़ा पैशात पुण्यापर्यंत कसे जाणार? घरी कळवायची सोय नव्हती. जाणार होतो भलतीकडे आणि एकदम चिपळूणला का गेलो याचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे लागले असते.
चिपळुणात अवजड सॅका पाठीवर घेऊन आम्ही पोलीस स्टेशन शोधू लागलो. पाहता पाहता आमची खासगी बाब सार्वजनिक झाली आणि त्यावर मुक्तपणे चर्चाही झाली. एकाने सल्ला (फु कटचा) दिला. पोलिसांकडे जाऊन काय उपयोग नाही. ते काही तुम्हाला पुण्याला सोडणार नाहीत. झालेदेखील तसेच; पोलीस चौकीत पोलिसांनी हेच सांगितले. ‘हे पा, आमी तर काय तुम्हाला पुण्याला सोडू शकणार नाही. तेवा घरच्यांना कळवा. इथून स्टेशनातून करा फोन.’  नेमके तेच तर टाळायचे होते. मग आम्ही थाप मारली की आम्ही होस्टेलला राहतो. ‘आता मंग, अस करा, इथून रेल्वेने पनवेलला जा, तिकडून विदाऊट टिकीट बसा आणि कोणी पकडला तर सांगा, आमाला आत्ता काय सांगितला ते,’ हा भन्नाट सल्ला ऐकून गरगरल्यासारखेच झाले.
शेवटी निघालो. वाटेत एका टायरच्या दुकानावर पाणी पिण्यासाठी थांबल्यावर मालकाला सगळी कहाणी ऐकवणे भाग पडले. त्याने कराड फाटय़ापर्यंत जाणाऱ्या एका दादाच्या सुमोत आमची रवानगी केली. आमची कहाणी ऐकून दादांनी गाडीतील शिल्लक वडापाव दिले. मनोमन त्यांना शतश: धन्यवाद देत त्या थंडगार वडापाववर तुटून पडलो. ते खाल्ल्यानंतर उपाशीपणाचे महत्त्व जाणवले. रात्री अकराच्या सुमारास दादांनी कराड फाटय़ाजवळ सोडले आणि आभाराची वाट न पाहता भरकन गाडी निघून गेली. आम्ही पुढच्या प्रवासासाठी वाहनांना हात दाखवायला सुरूवात केली. बऱ्याच वेळाने एक टेंपो थांबला. नेमका तो पोल्ट्री फार्मचा होता. पण आता पर्यायही नव्हता. कसेबसे अंग चोरून कोंबडय़ांबरोबर बसलो. चाळीसपेक्षा कमी वेगाने जाणे म्हणजे कमीपणा असल्यासारखी गाडी जात होती. धरायला काही नसल्याने इकडून तिकडे आपटणे माझ्या नशिबी आले. अर्थात आमची कर्मकहाणी इतक्यात संपणारी नव्हतीच, पुण्याला पोहोचेपर्यंत बरेच काही वाढून ठेवले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास त्याने आम्हाला कराडला आणून सोडले आणि वीस रूपये घेऊन निघून गेला. थंडी कमालीची होती आणि तसेच कुडकुडत आम्ही पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाची वाट पहात बसलो. थोडय़ा वेळाने कोल्हापूरकडून येणारा दूध टँकर दिसला. त्या भल्या चालकाने आम्हाला आत घेतले. चला आता पुण्यापर्यंत काही त्रास नाही म्हणत सुखात बसलो. पहाटे पहाटेला पुण्याजवळ येऊन ठेपलो, तोच त्याने टँकर बाजूला घेतला. आम्ही प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत असताना त्याने खुलासा केला
‘सायेब, आम्ही रातभर टँकर चालवतो. पन या येळेला जाम झोप येतुया. म्हनून या येळेला आमी गाडी चालवत नाय. तुमी जरा सरकून बसा मी जरा झोपतो हितं.’
बिच्चारे आम्ही, मिळेल त्या जागेत दाटीवाटीने बसलो आणि त्याला झोपायला जागा केली. थोडय़ाच वेळात तो घोरायला पण लागला. आणि आता तो कधी जागा होणार याची वाट पहात आम्ही बसून राहिलो. तासभर असाच गेला आणि मग महाराज उठले. खाली उतरून तोंड खंगाळून निवांतपणे मशेरी लावायला सुरूवात केली. त्याचा वेग पाहून एक मित्र माझ्या कानात कु जबुजला,
‘अरे त्याला म्हणावं, किमान दुपापर्यंत तरी पुण्याला पोहोचव रे बाबा. मरणाची भूक लागली आहे.’ आमचीही तीच अवस्था होती. आदले दिवशी दुपारी चिपळूणला केलेल्या जेवणानंतर रात्रीच्या त्या थंड वडापावव्यतिरिक्त काहीच खाल्ले नव्हते. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहात महाराज चहा प्यायला बसले. मग सावकाश येऊन टँकर चालू केला आणि काही वेळाने आम्हाला कात्रजला टाकले. तिकडून मग सहा आसनीने स्वारगेट आणि मग घरी. खिशात फक्त दोन रूपये उरले होते. मनोभावे ते कपाळाला लावले आणि म्हणालो, असा पुन्हा कधी रूसू नकोस रे बाबा.
संपूर्ण पोस्ट पाहण्यासाठी – http://destinationsahyadri.blogspot.in/2010/03/blog-post_11.html