सकाळी ट्रेनमधून आसनगावला जाताना खिडकीजवळच बसून थंडीचा आस्वाद घेत निघालो. शहरापासून दूर जाताना खरा हिवाळा ऋतू जाणवू लागला. आसनगाव रेल्वे स्थानकापासून रिक्षाने शहापूर, शहापूरपासून बसने डेणे गावी उतरलो.  रस्त्यावरची पायपीट सुरू झाली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात थकवा जाणवत नव्हता. रुंद व सपाट रस्त्याच्या दोन्ही बाजूना वाळलेले सोनेरी गवत जणू पिकलेल्या िपगट केसांप्रमाणे दिसत होते. अधूनमधून झाडेही होती. विजेच्या तारांवरच सुंदर पक्षी बसलेले दिसले.
असे म्हणतात, या गडावर वाल्मिकी ऋषींचे वास्तव्य होते, इथे लव-कुशचा जन्म झाला आणि ते त्यांना आजोबा म्हणत यातूनच या गडाला, डोंगरालाही आजोबा असे नाव पडले.
बरेच चालल्यानंतर डाव्या बाजूला गावातली घरे दिसू लागली. उंबराच्या फळांच्या सुगंधाबरोबर जंगल सुरू झाल्याचे जाणवले. वनसंपत्ती दिसू लागली. झाडांना ठोकलेल्या लोखंडीपट्ट्या गंजलेल्या असल्याने नव्याने पाहिलेल्या एकाही झाडाचे नाव कळाले नाही. यामुळे बांबूच्या झाडाला उसाचे तर घायपाताच्या झाडाला अननसाचे झाड म्हणत मी माझे शहरी अज्ञान (बेशरमपणे) प्रकट करत होतो. खडकाळ रस्त्यावरून चालत असतानाच समोरून बाईकस्वार आले. चारचाकीचेही ठसे दिसले. वर एका पठारापर्यंत गाडी जाते. पण ती नेण्यासाठी कौशल्य करावे लागते. आम्ही मात्र चालत आश्रमापर्यंत आलो.
जवळच असलेला पाण्याचा झरा बाराही महिने वाहतो. त्या सभोवतालची जागा खूपच सुंदर आणि वास्तव्य करावेसे वाटेल अशी आहे. पण आम्ही तर श्रमासाठी आलो होतो, आश्रमासाठी नव्हे. आधी पोहोचलेल्या सोबतच्या गटाला विचारल्यावर त्याने हाताने दाखवलेल्या दिशेने निघालो, जिथे तीन रस्ते दिसत होते. अगदी थोडय़ा वेळाने रस्ता सापडेनासा झाला. तरीही मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. खरेतर पावसाळ्यात धबधबा असावा. छोटय़ा छोटय़ा दगडांना बाजूला सारत मोठमोठय़ा शिळांवर उडय़ा मारत निघालो.  
ज्यांनी रस्ता दाखवला ते वेगळ्या मार्गाने जात असल्याचे त्यांच्या हुल्लडबाजीमुळे कळले. धबधब्याच्या मार्गाने उतरू लागलो, तर लहानमोठा कोणताही दगड साथ देईनासा झाला. पाय ठेवल्यावर दगड गडगडू लागले. पुन्हा त्याच मार्गाने उतरून आश्रमापाशी आलो आणि आश्रमातल्या महिलांनी योग्य वाट सांगितली.
पाऊलवाट ओळखीची वाटली..गडाकडे जाणारी असते अशी पालापाचोळय़ाने भरलेली. वाटेत कुठेही काटेरी झुडपे किंवा निवडुंग नाही हे या गडमार्गाचे वैशिष्टय़. आता नातूच येणार आहे म्हटल्यावर आजोबांनीच ही तयारी केली असावी. वेगवेगळे पक्षी जोरजोरात शिटय़ा मारू लागले. झाडांची बरीच पाने वाळलेली. अगदी हिरवी पानेही धूळ साचल्याने जुनी, थकलेली वाटली. पण तरीही झाडांनी काही माकडांना पिल्लांसकट कडेवर घेतलेले होते. निसरडय़ा मातीवर तर कधी हलणाऱ्या दगडांवर पाय ठेवत उंची गाठू लागलो. मार्गशीर्ष महिना असल्याने गुरुवारी घरी आणलेली पाच फळे एक-एक करून ऊर्जा मिळवत होतो. कधी दम खात तर कधी फळ खात उत्साहाने चालत होतोच. गडावरची वाट जंगलातूनच जात असल्याने दुपारी बारा-एक वाजताही उन्हाचा तडाखा जाणवत नाही. बरेच चालून झाले तरी आजोबांची उंची पाहताना मान वर करावीच लागते. चढण अशी की पदभ्रमण करताना वाटेत मध्येच थांबल्यास हृदयाची धडधड स्पष्ट जाणवते. पण जंगल संपल्यानंतर प्रत्यक्ष डोंगराच्या शिळा आधाराचा हात देतात आणि अध्र्या उंचीवरच ट्रेक पूर्ण झाल्याचे घोषित केले. इथून पुढे (डावीकडे) वर जाण्यासाठी प्रस्तरारोहणाचे साहित्य सोबत असणे जरुरीचे आहे. वाट संपली आणि पलीकडे लगेचच दरी सुरू झाली. डाव्या व उजव्या बाजूला डोंगर असून दोन्ही डोंगरांमध्ये दहा-बारा मीटर अंतर आहे. या अगदी छोटय़ा जागेला ‘सीतेचा पाळणा’ म्हणतात. उजव्या बाजूला असलेल्या डोंगरात एका खोलगट जागेत जाण्यासाठी प्रस्तरारोहण करण्याची संधी मिळाली. तिथे एक पालखी असून त्यावर तुकाराम असे लिहिले आहे. तसेच एका आयताकृती विटेवर दोन लहान मुलांच्या (कथेतील लव-कुशच्या) पायाचा आकार आहे (ठसा नाही). या दरीत फोटोग्राफी करण्याची संधी सोडून चालणार नव्हते. पण उंचावरून अचानक मोठमोठे दगड कोसळू लागले. डाव्या बाजूच्या डोंगरावरून मोठा दगड निसटून वाटेतच आदळला. त्याचे तुकडे होऊन वेगाने सरळ रेषेत पडू लागले. जणू आजोबा रागावले. यामुळे सीतेच्या पाळण्यात जास्त वेळ न खेळता उतरण्यासाठी घाई करू लागलो. भक्कम भासणारे दगडही पाय ठेवल्यावर घरंगळू लागले. त्यामुळे गड उतरताना सावधानता घ्यावी लागली. वाटेत खाल्लेल्या  फळांच्या सालीमुळे उतरतानाचा मार्ग योग्य असल्याची खात्री पटत होती. एखाद्या फळाची बी रुजून ते झाड कधीतरी मोठे होईल हा आपला विश्वास, कदाचित गोड अंधविश्वास आहे.
गडावरून उतरताना वाटा स्पष्ट दिसतात. उतरत असताना एका दगडाला शेंदूर फासून देवत्व देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. धबधब्याच्या मार्गाने जाण्याच्या प्रयत्नात एक तास वाया गेला व खूप उशीर झाल्याचे जाणवले. येथे आदल्या दिवशी येऊन वास्तव्य केल्यास उत्तम. गावाचे ‘गावपण’ लक्षात येऊ लागले. परतीच्या प्रवासात एकही वाहन दिसेना. बारा किमी अंतर पायी चालण्याची शिक्षा मिळण्याची चिन्हे दिसत होती. पण रेती वाहून देणाऱ्या एका ट्रॅक्टरमधून परतीचा प्रवास सुरू झाला. रेतीवर बसल्याने यावेळी रस्त्याचा खडकाळपणा अजिबात जाणवला नाही. खूप आग्रह करूनही चालकाने पसे घेतलेच नाहीत. डोळखांब येथे बरेच गावकरी आमच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी परतीच्या प्रवासासाठी टेम्पोची व्यवस्था केली.
निसर्गसौंदर्य, वनसंपत्ती, प्रस्तरारोहणाचा छोटा सराव, गावक ऱ्यांनी केलेलं स्वागत व निरोप अनुभवण्यासाठी आजोबांना भेटायला नक्की जा!