मँचेस्टरच्या मैदानात रविवारी रंगलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारताने जिंकला. पावसाच्या अडथळ्यामुळे डकवर्थ-लुइस पद्धतीने हा सामना भारताने ८९ धावांनी जिंकला. या सामन्यातील विजयाबरोबर भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अपराजित राहण्याची परंपार कायम ठेवली आहे. सामन्यातील नाणेफेक वगळता सर्वच गोष्टी भारताच्या बाजूने घडत गेल्या आणि भारताचा विजय झाला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय अनेक पाकिस्तानी चाहत्यांना फारसा रुचला नाही. त्यांनी तशी नाराजी सोशल नेटवर्किंगवरुन व्यक्त केली आहे. पाकिस्तानी संघाचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर तर सरफराजच्या या निर्णयावर चांगला नाराज असून त्याने सरफराजला ‘अक्कल शून्य कर्णधार’ म्हटले आहे.

भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर या सामन्याचे विश्लेषण करणारा एक व्हिडिओ शोएबने त्याच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे. ११ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये शोएबने पाकिस्तानी संघावर ताशेरे ओढले असून सरफराज आणि संपूर्ण सामन्यादरम्यान त्याच्या चुकलेल्या निर्णयांवर सडेतोड शब्दात टिका केली आहे. ‘मला कळत नाही एखादा कर्णधार एवढा अक्कल शून्य कसा असू शकतो. सरफराजला हे कळायला हवे होती की हा (पाकिस्तानी) संघ धावांचा पाठलाग करु शकत नाही. संपूर्ण सामन्यामध्ये खेळपट्टी कोरडीच होती ती ओली असण्याचा संबंधच नाही. सरफराजला ठाऊक आहे की पाकिस्तानची ताकद त्यांची गोलंदाजी आहे. त्यामुळेच महत्वपूर्ण नाणेफेक जिंकूनही त्याने ही संधी वाया घालवली आणि त्याने पुन्हा एकदा अक्कल शून्य नेतृत्वाचे दर्शन घडवले,’ अशी टिका शोएबने या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

कर्णधार सरफराजबरोबरच शोएबने संघ व्यवस्थापनावरही तोंडसुख घेतले आहे. पाकिस्तानी संघ व्यवस्थापन मैदानावरील घडामोडींबद्दल अनभिज्ञ होता. ‘आमच्या संघ व्यवस्थापनाला काही कल्पनाच नव्हती. संघ व्यवस्थापनासमोर सरफराज अहमदचा पोपट झाला होता. नेतृत्व कसे करावे आणि निर्णय कसे घ्यावेत हे काहीच सरफराजला समजत नव्हते.’

दरम्यान, सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सरफराजने आपली बाजू मांडली. पाकिस्तान संघ गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर घराब कामगिरी करत असल्याने पाकिस्तानचा पराभव झाल्याचे सरफराज म्हणाला.