दिल्लीच्या सीमेवर सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाचा आज २९ वा दिवस आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी पुन्हा शेतकरी संघटनांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी केंद्राला प्रतिसाद दिलेला नाही. केंद्राशी बोलणी करून काही निष्पन्न होत नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. केंद्राच्या निमंत्रणावर आज निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. एकीकडे हे आंदोलन लांबत चालेलं असतानाच दुसरीकडे या आंदोलनाला पाठिंबा आणि विरोध करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या अशाच एका आजींची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

शेतकरी आंदोलनाचा आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक ६२ वर्षीय महिला थेट पटियालावरुन सिंघू बॉर्डरवर पोहचल्यात. पटियाला ते सिंघू बॉर्डर हे अंतर २३१ किमी इतकं आहे. किसान एकता मोर्चाच्या ट्विटर हॅण्डलवरुन ओपन जीप चालवणाऱ्या या महिलेचा फोटो पोस्ट करुन ही माहिती देण्यात आली आहे. “६२ वर्षीय मनजीत कौर या पटियालावरुन सिंघू बॉर्डरवर गाडी चालवत आल्या आहेत. शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्या आल्यात,” असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलेलं आहे. या फोटोमध्ये मनजीत या गाडी चालवताना दिसत असून त्यांच्या बाजूला त्यांच्या सहकारी बसल्या आहेत. तर मागील बाजूस उभ्या असणाऱ्या महिला कार्यकर्त्या घोषणा देताना दिसत आहेत.

अनेकांनी या आजींचं कौतुक केलं आहे. ट्विटवर अनेकांनी या आजींची ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे.

१)

२)

३)

४)

५)

६)

एकंदरितच या आजींचा हा अंदाज अनेकांना आवडल्याचे चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे. दरम्यान, मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी विदेशी पत्रकारांशी संवाद साधून शेती कायद्यासंदर्भात बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार खुल्या मनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. नव्या शेती कायद्यांमधील प्रत्येक अनुच्छेदावर केंद्र चर्चा करेल, असे तोमर यांनी सांगितले. कोणालाही न विचारता केंद्र सरकारने कायदे केल्याचा शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्षांचा आरोप तोमर यांनी फेटाळला. शेती क्षेत्रातील बदलांवर गेली वीस वर्षे विविध स्तरांवर चर्चा झाली आहे. विविध तज्ज्ञ समित्यांनी केलेल्या शिफारशींचा विचार करण्यात आला आहे. हे कायदे एका रात्रीत आणले गेलेले नाहीत, असा युक्तिवाद तोमर यांनी केला.