देशातला करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. काही राज्यांमधला लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. बिहारमधला लॉकडाउनही आता वाढवण्यात आल्याचं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करुन सांगितलं आहे. त्यांच्या या ट्विटवर एका तरुणाने केलेली कमेंट मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

नितीश कुमार यांच्या या ट्विटवर पंकज कुमार गुप्ता नावाच्या तरुणाने कमेंट करत चक्क लग्नांवरही बंदी घालण्याची मागणी केली आहे. आपल्या या ट्विटमध्ये तो म्हणतो, “सर, जर तुम्ही लग्नांवर बंदी घातली असती, तर माझ्या प्रेयसीचं १९ मेला होणारं लग्नही थांबलं असतं. आम्ही जन्मभर तुमचे ऋणी राहू.”

आणि याहूनही भन्नाट गोष्ट म्हणजे पंकजच्या ट्विटला नव्या कुमारी नावाच्या एका तरुणीने उत्तर दिलेलं आहे. ती म्हणते, “जेव्हा तू मला सोडून गेलास आणि पूजाशी बोलायला लागलास, त्यावेळी मी खूप रडले. आज मी आनंदाने लग्न करत आहे. त्यामुळे मी तुला विनंती करते की तू हे सगळं करणं बंद कर. माझं लग्न कोणाशीही होऊ दे, पण तू कायम माझ्या मनात राहशील. माझ्या लग्नाला नक्की ये.”

या दोन्ही ट्विटवर सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. हे दोन्ही ट्विट्स वेगाने व्हायरल होत आहेत. तर बिहारमधली करोनाची स्थिती लक्षात घेता तिथला लॉकडाउन १६ मे पासून २५ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा सुविधा बंद ठेवण्यात येणार आहेत.