बदलत चाललेलं वातावरण, त्यातून होणारे बदल याचा फटका ओदिशामधल्या शेकडो वर्ष जुन्या मंदिराला बसला आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे किनाऱ्यावर असलेल्या मंदिराला धोका निर्माण झालाय. अखेर आपली ४०० वर्षांची प्रथा मोडीत काढून केवळ मंदिर वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी पहिल्यांदाच गाभाऱ्यात पुरुषांना प्रवेश दिला आहे. ओदिशातल्या केंद्रपाडा गावात हे मंदिर आहे.

ओदिशामधील पंचबाराही देवीच्या मंदिरात पुरुषांना प्रवेश निषिद्ध आहे. या मंदिरात दलित कुटुंबातील स्थानिक मच्छिमार महिलांनाच प्रवेश दिला जातो. या महिला पूर्वापार देवीची पूजा करत आहेत. पण वाढत्या समुद्र पातळीमुळे या मंदिराला धोका निर्माण झालाय म्हणूनच गावकऱ्यांनी मंदिरातील देवीची मूर्ती किनाऱ्यापासून काही किलोमीटर दूर असणाऱ्या मंदिरात नेल्या आहेत. मूर्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी पुरुषांची मदत महिलांनी घेतली. किनाऱ्यापासून पंचबाराही देवीचं मंदिर पाच किलोमीटर लांब होतं पण आता पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे धोका निर्माण झाला असल्यानं नवीन ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं आहे.