महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी लॉकडाउन वाढवण्याच्या मुद्दावर पुन्हा एकदा आपली चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाउनसारखे निर्णय आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरू शकतात असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. पण प्रशासनासमोर असलेले पर्याय सुद्धा तितके सोपे नाहीत हे सुद्धा त्यांनी मान्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी आपल्या टि्वटमध्ये एका लेखाचा सुद्धा दाखला दिला आहे. ज्या लेखात कोविड-१९ ची लागण न झालेल्या रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष आणि लॉकडाउनच्या गंभीर मानसिक परिणामांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. ‘लॉकडाउन वाढवल्यामुळे फक्त आर्थिक अनर्थच ओढवणार नाही तर त्यामुळे दुसरे गंभीर वैद्यकीय संकट निर्माण होऊ शकते’ असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

“लॉकडाउन आणखी बऱ्याच काळासाठी वाढवला तर आर्थिक हाराकिरीची परिस्थिती निर्माण होऊ शकते” असे आनंद महिंद्रा या महिन्याच्या सुरुवातीला म्हणाले होते. “लॉकडाउनमुळे लाखो लोकांचे प्राण वाचवता येतील पण लॉकडाउन वाढला तर मात्र समाजातील कमकुवत घटकांच्या अडचणींमध्ये वाढ होईल” असे त्यांनी लिहिले होते.

देशात सध्या चौथा लॉकडाउन सुरु आहे. पण अजूनही करोना व्हायरसची साखळी तोडता आलेली नाही. देशात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढतेय. देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 38 हजार 845 वर पोहचली आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 6 हजार 977 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 154 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra says lockdown extensions could be economically disastrous dmp
First published on: 25-05-2020 at 18:44 IST