उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. विविध मुद्द्यांना ट्विटरच्या माद्यमातून वाचा फोडण्याचं काम ते करत असतात. नुकतंच महिंद्रा यांनी नॉर्वेच्या राजदूतांनी केलेल्या एका ट्विटला रिट्विट करत करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एक विनंती केली आहे.

नोर्वेचे राजदूत एरिक सोल्हेम यांनी शनिवारी (दि.२९) आपल्या ट्विटर अकाऊंटवरु एक फोटो टि्वट केला. ‘निसर्गासोबतच विकास शक्य आहे’, असं म्हणत त्यांनी नेदरलँड्सच्या ईकोडक्ट नावाच्या एका ब्रिजचा फोटो त्यांनी ट्विट केला. या ब्रिजची खासियत म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या जंगलाला हा ब्रिज जोडतो. यामुळे जंगली प्राणी आणि अन्य वन्यजीव आपला जीव धोक्यात न घालता ब्रिजवरुन रस्ता पार करतात. विशेष म्हणजे हा ब्रिज कॉंक्रिटचा नाहीये, तर त्यावरही सर्वत्र हिरवळ पसरलेली फोटोमध्ये दिसत आहे.

आनंद महिंद्रांना हा फोटो इतका भावला की त्यांनी सोल्हेम यांचं ट्विट रिट्विट करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली. “नितीन गडकरीजी जर भारतातही विशिष्ट परिसरात महामार्ग बांधताना अशाप्रकराचं एखादं स्टँडर्ड फीचर दिलं तर आम्ही उभे राहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवू”, असं आनंद महिंद्रा म्हणाले. महिंद्रांच्या या विनंतीवर काही तासांमध्येच नितीन गडकरींनीही प्रतिक्रिया दिली.

“आनंद महिंद्राजी आपण दिलेल्या सल्ल्याबद्दल खूप आभारी आहे. हो…. अशाप्रकारच्या नवनिर्मितीचीकडे आपल लक्ष देण्याची गरज आहे…पर्यावरणीय समतोल राखलाच पाहिजे” असं गडकरी म्हणाले. यासोबतच दुसऱ्या एका ट्विटमध्ये “आम्ही एनएच-४४ वर सियोनी (मध्यप्रदेश) आणि नागपूरमध्ये एक ऍनिमल कॉरिडोर विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. याचे परिणाम चांगले आले आहेत. भविष्यातही मनुष्य आणि प्राण्यांच्या शांततामय सहअस्तित्वासाठी प्रयत्न करत राहण्याची गरज आहे,’ असं गडकरी म्हणाले.

दरम्यान, जंगलातून जाणाऱ्या हायवेमुळे अनेक जनावरांना भरधाव गाडीखाली आल्यामुळे जीव गमवावा लागतो. यावरचा उपाय म्हणून आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरींना सुचवलेली कल्पना नेटकऱ्यांनाही चांगली आवडली असून त्यांच्या ट्विटखाली विविध प्रतिक्रिया देत आहेत.