अर्णब गोस्वामी आणि बरखा दत्त यांची भारताला नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. दोघांचंही पत्रकारितेच्या आपापलं स्वतंत्र स्थान, मजबूत शैली आहे.आणि दोघांच्याही वाट्याला असंख्य चाहते आहेत. त्यांच्यावर टीका करणारोही पुष्कळ असले तरी ही दोघंही चर्चेत राहणारी नावं आहेत एवढं खरं.

पण बऱ्याच लोकांना माहीत नसेल की अर्णब गोस्वामी आणि बरखा दत्त एका दशकापूर्वी एनडीटीव्हीमध्ये एकमेकांचे सहकारी होते. या दोघांमध्येही स्पर्धा होती तसंच काही प्रमाणात शीतयुध्दसुध्दा होतं. बरखा दत्त यांनी एनडीटीव्हीमध्ये आपली ओळख निर्माण केली तर अर्णबनी एनडीटीव्ही सोडत ‘टाईम्स नाऊ’चा ब्रँड जवळजवळ एकहाती तयार केला आणि लोकप्रियतेच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर टिकवून ठेवला.

आता हे दोघे प्रतिस्पर्धी चर्चेत आले आहेत ते अर्णब गोस्वामींनी बरखा दत्त यांना दिलेल्या टोमण्यामुळे.अर्णब गोस्वामी एक समारंभात पाहुणे म्हणून हजर होते. त्यांना एका विद्यार्थ्याने तुम्हाला यापुढच्या काळात बरखा दत्त यांच्यासोबत काम करायला आवडेल का असं विचारलं. पुढच्या व्हिडिओमध्ये पहा त्यानंतर काय झालं ते.

सौजन्य: व्हायरल व्हिडिओ, यूट्यूब

हा प्रश्न अर्णब गोस्वामींना विचारताच सभागृहात हशा पिकला आणि या प्रश्नावर ते काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं.

“मी पत्रकारिता करतो.” अर्णब गोस्वामी म्हणाले “मला माहीत नाही ‘त्या’ काय करतात”

गोस्वामी आणि बरखा दत्त यांच्यातली स्पर्धा सार्वजनिकरीत्या अनेकदा समोर आली आहे. दोघांनीही एकमेकांवर जाहीरपणे पण नाव न घेता टीका केली आहे. अर्णब गोस्वामींची आक्रस्ताळी शैली, स्वत:च्याच कार्यक्रमात अनेकदा इतरांना बोलू न देणं तसंच त्यांनी त्यांच्या चॅनलवरून दत्त यांच्यावर केलेली टीका या अनेक कारणांवरून बरखा दत्त यांनी ‘मी ज्या क्षेत्रात काम करते त्याच क्षेत्रात ‘हा माणूस’ काम करतो याची मला लाज वाटते’ अशा जळजळीत शब्दात अर्णब यांच्यावर टीका केली होती.

वाचा- ‘बाथरोब’मधला फोटो व्हायरल झाल्याने डोनाल्ड ट्रम्प भडकले

आपापल्या चॅनल्सनमधून राजीनामा दिल्यावर अर्णब आणि बरखा दत्त दोघेही आपापली स्वतंत्र मीडिया हाऊसेस उभारणार आहेत. अर्णब गोस्वामी यांचं ‘रिपब्लिक वर्ल्ड’ लवकरच सुरू होत आहे. तर बरखा दत्त यांनीही आपल्या नव्या मीडियाहाऊसचं सूतोवाच केलं आहे. यापुढच्या काळात हे दोघेही पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरती या दोघांमध्ये वादाच्या फैरी झडत आहेत.