‘नको असेल ते द्या.. हवे असेल ते घेऊन जा..’ अशी माणूसकीची भिंत आता छत्तीसगढमधेही पीस क्लबने उभारली आहे. थंडीच्या दिवसांत जे रस्त्यावर कुडकुडत झोपतात त्यांना अंग झाकायला उबदार कपडे मिळावे यासाठी माणूकीच्या भिंतीचा उपक्रम राबवण्यात आला आहे. युवासत्ता या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन येथे ही माणूसकीची भिंत उभारली आहे. आज छत्तीसगढमध्ये एकूण ७ माणूसकीच्या भिंती आहेत. कडाक्याच्या थंडीत झोपणा-या गरीबांना उबदार आणि अंग झाकण्यापुरता कपडे मिळावे यासाठी ही माणूसकीची भिंत येथे रंगवण्यात आली आहे. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. फक्त कपडेच नाही तर चपला आणि इतर वस्तू देखील येथे लोक ठेवत आहेत.

PHOTOS 2016 : सोशल मीडियावर या विवाह सोहळ्यांची चर्चा अधिक

नागपुरात देखील अशीच माणुसकीची भिंत रायलो फाउंडेशनने रंगवली आहे. नागपुरातील शनी मंदिर नवीन ब्रिजखाली एक भिंत रंगवली. या भिंतीवर त्यांनी ‘माणुसकीची भिंत’ असे नाव कोरले. ‘नको असेल ते द्या.. हवे असेल ते घेऊन जा..’ असा संदेश रंगवून लहान मुले, महिला, पुरुष असे वेगवेगळे कप्पे करून कपडे अडकवण्यासाठी खिळेही ठोकले. नागरिकांनी त्यांच्याकडील कपडे आणायचे आणि त्या त्या कप्प्यानुसार अडकवण्याची व्यवस्था त्यांनी केली. विशेषत: जुने वापरातील कपडे, ब्लँकेट, स्वेटर्स, उबदार कपडे, लहान मुलांचे कपडे स्वच्छ धुवून, इस्त्री करून आणण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या माणुसकीच्या भिंतीला रखवालदार नाही, तर प्रत्येक अर्ध्या-एक तासाने जमेल तसे ‘रायलो फाऊंडेशन’चा एक सदस्य येऊन या भिंतीवर एक नजर टाकून जातो. येथे जमा झालेल्या वस्तू ज्यांना ज्या गरजेच्या आहेत त्यांनी त्या घेऊन जाव्यात, असा हा उपक्रम आहे.

वाचा: ‘नाताळात येशू ख्रिस्ताऐवजी माझ्या आजीचा वाढदिवस साजरा करा’