आपल्याकडे गणेशोत्सवात अनेक देखावे तयार केले जातात. विशेषत: सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये जनजागृतीसाठी एखाद्या सामाजिक किंवा अगदी राजकीय समस्येवरही भाष्य करणारा देखावा तयार करण्याची परंपरा कितीतरी जुनी आहे. बंगालमध्या दुर्गापूजेच्या मांडवांमध्येही याचप्रकारचे देखावे दिसतात. एकंदरीतच जनतेच्या मनात असणाऱ्या भावनांचं तसंच बदलत्या काळाचं प्रतिबिंब या उत्सवांमध्ये पडतं. आता गुवाहाटीमधल्या सरस्वतीपूजनाच्या सणासाठी केलेला एक देखावा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. याचा फोटोही व्हायरल झालाय. पहा तर! या देखाव्यात सरस्वती देवीशी तिचा भक्त व्हाॅट्सअॅपवरून चॅट करतोय असं दाखवण्यात आलंय. देवीदेवतांच्या प्रतिमा,त्यांच्याविषयीच्या कल्पना एरव्ही एखाद्याच्या मनात भीती उत्पन्न होईल अशा नेहमीच निर्माण केल्या जात असताना व्हाॅट्सअॅपवरून साक्षात देवी सरस्वतीशी भक्तांनी संवाद साधण्याच्या कल्पनेचा देखावा जाम लोकप्रिय ठरला आहे. या देखाव्यात भक्त आणि देवीमधले हे संवाद लावण्यात आलेत. ''Hey माँ" भक्त म्हणतो "Hello" सरस्वती देवीचं प्रेमळ उत्तर "तुमचा dp छान आहे" भक्त "थँक्यू :) " "तुम्ही काय करत आहात?" "काही नाही, सतार वाजवतेय" "मला जरा परीक्षेत मदत करा ना" भक्ताचा टाहो "Hmm..लेट्स सी" सरस्वती देवीचं सूचक उत्तर! हा छोटासा पण मजेशीर संवाद नेटवर व्हायरल झालाय. मंडपात लावलेल्या या देखाव्याविषयी फेसबुकवर निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बहुतेक सगळ्यांना ही कल्पना जाम आवडलीये. viral : निर्वासितांनी देखील अमेरिकेला महान बनवले! "काय मस्त देखावा आहे. धार्मिक कल्पना आणि आधुनिक टेक्नाॅलाॅजी यांची सांगड घालणारी ही कल्पना धमाल आहे" दिशा बराल या गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या एका मुलीने म्हटलंय. तर देवीदेवतांच्या प्रतिमांचा वापर अशा पध्दतीने केला जाऊ नये असेही सूर उमटत आहेत. पण यालाही नेटिझन्स उत्तरं देत आहेत. या देखाव्यावर आक्षेप घेणाऱ्यांना बाकीचे तेवढ्याच जोरकसपणे उत्तरही देत आहेत. "आधुनिक जग विद्या आणि तंत्रज्ञान या सरस्वती देवीच्या रूपांमुळेच पुढे आलं आहे. मग हेच पुढे नेत हा देखावा केला तर त्याने देवीचा अपमान मुळीच होत नाही" अशा शब्दात शुभ्रानील सिन्हाने या सगळ्यांना जोरदार उत्तर दिलंय. भक्त आणि त्याच्या दैवताचं नातं हेच मुळात त्या दोघांचं असतं. आपल्या वारकरी पंरपरेतही 'माझा विठुराया" अशी साद घालत लाखोंचा मेळा दरवर्षी जमतो. मग हाच धागा पुढे नेत आपल्या सर्वांच्या जीवनातल्या घटनांचं आणि गोष्टींचं प्रतिबिंब आपल्या धार्मिक सणांमध्ये पडलं तर काय चुकलं? कुठल्याही प्रतिमेचा अवमान न करता सर्वांच्या भावनांचा आदर राखून केलेले हे नवीन प्रयोग त्या उत्सवाच्या प्रसाराला आणि त्याजोडीने सामाजिक एकतेला मदतच करतात. लोकमान्य टिळकांना हेच अभिप्रेत होतं नाही का?