भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी तुलना करत तोंडभरुन स्तुती केली आहे. अनेक गोष्टींमध्ये कोहली हा जगातील महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिनपेक्षा उजवा असल्याचे मत हार्दिक पांड्या आणि के.एल राहुल यांनी व्यक्त केले आहे. राहुल-पांड्याच्या या वक्तव्याचा नेटीझन्सनी चांगलाच समाचार घेतला आहे.

हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी करण जोहर यांच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रॅपीड फायर राऊंडमध्ये करणने सचिन आणि विराट मधील चांगला फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला होता. राहुल आणि पांड्या दोघांनीही विराट कोहलीला पसंती दिली. राहुल-पांड्याच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी दोघांना ट्रोल केलं आहे. याशिवाय यांना विचारले की, धोनी आणि विराटमधील चांगला कर्णधार कोण? यावेळी दोघांनीही धोनीला पसंती दिली.

करण जोहरने हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला अनेक प्रश्न विचारले. दोघांच्या आवडी-निवडी आणि अनेक मजेदार किस्से यावेळी समोर आले. लाइफस्टाइल, बॉलीवूड, क्रश,  आवडते चित्रपटे, आवडती अभिनेत्री याविषयी अनेक बाबींचा उलगडा झाला. करणने यावेळी राहुलला प्रश्न विचरले की, भारतीय संघात कोणत्या खेळाडूला थेरपीची गरज आहे? यावेळी राहुलने विराट कोहलीचे नाव घेतले. राहुल म्हणाला, विराट कोहलीला शांत राहण्याची गरज आहे. हे मी विराटला प्रत्येकवेळी सांगत असतो. विराट कोहली कधीच सुट्टी घेण्याच्या विचारात नसतो. त्याला फक्त काम आणि काम करायचे असते. तसेच, शाहरूख खानच्या चित्रपटातील राहुल नावावरून माझं नाव राहुल ठेवण्यात आल्याचा खुलासा केएल राहुलने केला.