महामार्गावरील ५०० मीटरच्या परिसरात असेली दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहे. याआदेशानुसार या परिसरात असलेल्या हॉटेल्स किंवा बारमध्ये दारूची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे, या निर्णयाचे सगळीकडूनच स्वागत होत आहे अशा वेळी या लढाईत मोलाचे योगदान दिलेल्या हरमन सिद्धू यांना विसरून चालणार नाही. कारण महामार्गावर असणारी दारूनची दुकाने बंद करण्यासाठी त्याने गेले अनेक वर्ष लढा दिला आहे आणि अखेर सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने त्यांचा हा लढा सफल झाला आहे. काही वर्षांपूर्वी हरमन सिद्धू आपल्या काही मित्रांसोबत जंगल सफारीला गेले होते, पण पक्क्या रस्त्याने न जाता त्याने आडवाटेचा रस्ता धरला. जागा निसरडी होती त्यामुळे त्यांची गाडी दरीत कोसळली. या अपघाताच्या वेळी त्यांचे मित्र कसेबसे बचावले पण हरमन यांना कायमचे अपंगत्त्व आले. १९९६ ची ही घटना, वयाच्या २६ वर्षी या तरुणाला कायमचे अपंगत्त्व आले. आपल्या नशीबाला ते सारखे दोष द्यायचे पण एका घटनेने मात्र त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले.

रुग्णालयात असताना त्यांच्यासारखे रस्ते अपघातात जखमी झालेले, मृत्यूमुखी पडलेले आणि कायमचे अपंगत्त्व आलेले अनेक होते आणि तेव्हापासून रस्ते अपघातग्रस्तांसाठी त्यांनी काम करण्याचे ठरवले. त्यांनी जेव्हा रस्ते अपघाताबद्दल अधिक माहिती मिळवली तेव्हा धक्कादायक आकडेवारी त्यांच्यासमोर आली. भारतात दर ४ मिनिटाला रस्ते अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागतो, यातले ३५ टक्के अपघात दारू पिऊन गाडी चालवल्याने होतात, दुसरी गोष्ट म्हणजे हीच माहिती गोळा करत असताना पानीपत ते जालंधर या २९१ किलोमीटरच्या पल्ल्यात जवळपास १५० हून अधिक दारूची दुकाने असल्याचे लक्षात आले आणि ती बंद करण्यासाठी त्यांनी जनहित याचिका दाखल केली. त्यांच्या या लढाईमुळे त्यांनी १ हजार दारूची दुकाने बंद केली पण नंतर या निर्णयावर स्टे आणण्यात आला. पण याविरोधात हरमन यांनी आपली लढाई अशीच सुरू ठेवली.

महामार्गावरील ५०० मीटरच्या परिसरात असेली दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे. त्यामुळे दिर्घ काळापासून सुरू असलेल्या हरमन यांच्या लढाईला यश आले.