करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यातच अनेक उद्योग धंदेही ठप्प आहेत. अशा परिस्थितीत हातावर पोट असलेल्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यातच जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्यामुळे अनेकजणांना संकटाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. यापैकीच एक म्हणजे ट्रक चालक. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामान पोहोचवणाऱ्या ट्रक चालकांची स्थितीही सध्या बिकट झाली आहे. कारण सध्या अत्यावश्यक सेवांसाठी लागणाऱ्याच सामानांची वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामान वाहून नेणाऱ्यांपैकी एक ट्क चालक आहेत ते म्हणाजे कन्हैया कुमार. लॉकडाउननंतर गेले अनेक दिवस ते साताऱ्यातील वाई येथील एका ढाब्याजवळ अडकले आहेत. जेव्हा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली त्यावेळी ते आपले साथीदार हरप्रित सिंग यांच्यासोबत बंगळुरूवरून पुण्याला जात होते. पण अचानक आलेल्या या लॉकडाउनमुळे त्यांना पुढे जाणं शक्य झालं नाही. तेव्हापासून ते ओस पडलेल्या या ढाब्यावर अडकले आहेत. कन्हैया कुमार हे असे एकमेव चालक नाहीत ज्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. असे अनेक जण आहेत जे पेट्रोल पंप, ढाबे किंवा अन्य ठिकाणी अडकून पडले आहेत. एकीकडे थांबण्याचा प्रश्न तर दुसरीकडे सोबत असलेलं खाण्यापिण्याचं सामानही त्यांचं संपत चाललं आहे. त्यातच ढाबेही बंद असल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कन्हैया यांच्याप्रमाणेच राणा प्रताप हेदेखील एक ट्रक ड्रायव्हर आहेत. लॉकडाउनच्या घेण्यात आलेल्या निर्णयामुळे त्यांना आहे त्याच ठिकाणी थांबावं लागलं. त्यानी अन्य ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पोलिसांनी रोखलं. तसंच आता कोणतीही व्यवस्था नसल्यानं आपल्यावर उपासमारीची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं. पोलिसांच्या गाड्या त्यांना टोल नाक्यांवरूनच परत पाठवत आहेत. "लॉकडाउनमुळे केवळ अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या वाहनांनाच परवानगी आहे. त्यामुळे काही परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या लोकांनाही थांबवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत काही चालक आपले ट्रक सोडून निघून गेले आहेत," अशी माहिती ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष बाल मलकीत सिंग यांनी दिली. "कन्हैया कुमार याच्यासारख्या ट्रक चालकांनी आपल्या ट्रकमध्ये ४० दुचाकी असल्यामुळे त्याच ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत त्यांच्या उरले सुरलेले पैसे आणि खाण्यापिण्याचं सामानासहित मोबाईलवर बातम्या पाहण्याशिवाय कोणताही पर्याय नाही," असंही त्यांनी नमूद केलं.