भारतामध्ये ‘स्पॅम कॉल’चे प्रमाण जास्त असून हे कॉल जर आपण उचलले नाहीत तर वर्षाला आपले ६ कोटी ३० लाख तास वाचू शकतात. ऑनलाइन फोनबुक कंपनी असलेल्या ‘ट्रूकॉलर’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे. एक कॉल ३० सेकंदांचा असतो असे गृहीत धरले तरीही या कॉल्सकडे दुर्लक्ष केल्यास भारतीय यूजर्स आपले ६ कोटी ३० लाख तास वाचवू शकतात. जगात सर्वाधिक ‘स्पॅम कॉल’ येणाऱ्या वीस देशांच्या यादीत भारत सर्वात वरच्या स्थानावर असल्याचे दिसते. भारतातील प्रत्येक ‘ट्रूकॉलर’ युजर दर महिन्याला २२ ते २३ ‘स्पॅम कॉल’ घेत असल्याने भारत यामध्ये पहिल्या स्थानावर आहे. यानंतर अमेरिका आणि ब्राझिल २० ते २१ स्पॅम कॉल घेत असल्याने ते या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

तुमचं सिम कार्ड आधार कार्डशी लिंक आहे?

याशिवाय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही या विषयाकडे लक्ष देणे आवश्यक असून ‘स्पॅम कॉल’कडे गांभिर्याने पाहीले तर देशाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. नागरीकांनी आपल्याला येणारे ‘स्पॅम कॉल’ ब्लॉक केले तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दरवर्षाला २,६४४ कोटी रुपयांची भर पडू शकते. सध्याच्या काळात कोणत्याही व्यक्तीचा संपर्क क्रमांक मिळविणे अतिशय सोपे झाले आहे. काहीवेळा काही विशिष्ट अॅप्लिकेशन्स डाऊनलोड केल्यानंतर आपण आपली माहिती अगदी सहज भरतो. मात्र अशा स्त्रोतांमधूनच ‘स्पॅम कॉलर्स’ आपला संपर्क क्रमांक मिळवतात आणि आपल्याला फोन करतात. सध्या भारतात ‘स्मार्टफोन’ वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात ‘स्पॅम कॉल’च्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

जिओला टक्कर देणार ‘हा’ फोन

‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात जास्तीत जास्त ‘स्पॅम कॉल’ टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून आणि आर्थिक सुविधा देणाऱ्या कंपन्यांकडून करण्यात येतात. यामध्ये टेलिकॉम कंपन्याकडून ‘फ्री डेटा’ किंवा ‘अनलिमिटेड कॉल्स’ यांसारख्या ऑफर्स दिल्या जातात. याशिवाय अमेरिकेत यूजर्सना ‘क्रेडिट कार्ड’ आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लोनसंदर्भातील कॉल येतात. ‘ट्रूकॉलर’ने केलेल्या विश्लेषणानुसार, दक्षिण अफ्रिका, इस्त्रायल आणि स्विडन सारख्या देशांत ‘स्पॅम कॉल’ न घेतल्यास अनुक्रमे १२२ कोटी, ८४ कोटी आणि ८१ कोटी फायदा होऊ शकतो.