गोवा आयआयटीची सध्या सोशल नेटवर्कींगवर चांगलीच चर्चा आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे आयआयटी गोवाने त्यांच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये स्वत:चे प्रश्न स्वत: निवडून उत्तर देण्यास सांगितलं आहे. ही जगावेगळी प्रश्नपत्रिका सध्या सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अशापद्धतीने स्वत: प्रश्न देऊन स्वत: उत्तरं देणं किती योग्य आहे यासंदर्भातील चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ७० मार्कांच्या या पेपरसाठी विद्यार्थ्यांना केवळ दोन प्रश्न निवडून त्याची उत्तरं देणं अपेक्षित होतं. गोवा आयआयटीच्या व्हायरल झालेल्या या पेपरमधील पहिला प्रश्न ४० गुणांचा होता तर दुसरा प्रश्न ३० गुणांचा होता. विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या पुस्तकांमधूनच त्यांना स्वत: प्रश्न शोधून त्याची उत्तरं लिहायची होती. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबद्दल पूर्ण माहिती आहे की हे पाहण्यासाठी चाचणी घेण्यात आल्याच आयआयीने स्पष्ट केलं आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी दोन तासांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच हे प्रश्न निवडताना तुमच्या मित्रांशी चर्चा करु नया असाही सल्ला देण्यात आला होता. दोन मित्रांच्या प्रश्नांमध्ये साधर्म्य आढळल्यास कमी गुण देण्यात येतील असा इशारा विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. ही परीक्षा ११ मे रोजी घेण्यात आली होती. हा पेपर इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षातील अभ्यासक्रमासंदर्भातील होता. गोवा आयआयटीच्या या प्रश्नपत्रिकेवर अनेकांनी मजेदार कमेंट केल्यात. "गोव्यातील आयआयटीसुद्धा विद्यार्थ्यांना चील करण्याची संधी देते", अशी कमेंट एकाने केलीय. तर काहींनी यामधून विद्यार्थी किती प्रमाणिक आहेत हे सुद्धा तपासलं जाईल, असं म्हटलं आहे. या पेपरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा झाल्यानंतर आयआयटीमधील समितीने या पेपरसंदर्भातील विश्लेषण करणार असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भातील अहवाल मागवण्यात आला असून त्या अहावालाच्या आधारेच कारवाई केली जाईल असं आयआयटी गोवाचे निर्देशक बी. के. मिश्रा यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. खासगी स्तरावर मला हा पेपर योग्य वाटल्याचं मिश्रा यांनी म्हटलं. मात्र या पेपरला गुण देताना काय पद्धत वापरली पाहिजे याबद्दल प्राध्यापकांचे एकमत हवं. सध्या शिक्षणामध्ये अनेक अडथळे असताना आपण विद्यार्थ्यांची क्षमता नवीन पद्धतीने तपासली पाहिजे असं मत मिश्रांनी व्यक्त केलं.