चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरच्या अपयशामध्ये एक महत्वाची गोष्ट विसरुन चालणार नाही. बरोबर पाच वर्षांपूर्वी याच दिवशी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली होती. भारताच्या मंगळयानाने यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. भारताच्या या मंगळयान मोहिमेला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. अजूनही मंगळयान यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेमध्ये भ्रमण करत असून माहिती इस्रोला पाठवत आहे. रशियाची रॉसकॉसमॉस, नासा, युरोपियन स्पेस संस्थेनंतर मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणारा भारत चौथा देश ठरला. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी झेप घेणारा भारत पहिला देश ठरला होता.

मंगळयानाचे आयुष्य सहा महिन्यांचे होते पण अजूनही मंगळयान कार्यरत आहे. २००८ साली चांद्रयान-१ मोहिमेत इस्रोला हे साध्य करता आले नव्हते. त्यावेळी ऑर्बिटरने निर्धारीत वेळेआधीच काम करणे थांबवले होते. पण चांद्रयान-१ मध्ये चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले. चांद्रयान-२ मोहिमेतील ऑर्बिटरचे आयुष्य साडेसातवर्ष असणार आहे. आधी या ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते.

मंगळयानामध्ये पाच उपकरणे आहेत. मिथेन सेन्सर्स, कलर कॅमेरा आहे. पहिल्यावर्षी मॉमने १ टीबी डाटा पाठवला. मंगळयान मोहिमेत मिथेन किंवा अन्य काही हाती लागले आहे का ? याबद्दल इस्रोकडून अजून माहिती देण्यात आलेली नाही. मंगळयानातील सर्व उपकरणे अजूनही व्यवस्थित काम करत आहेत. मॉमने जी माहिती पाठवली आहे त्याचे विश्लेषण सुरु आहे. त्यामुळे मिथेन सेन्सर्सबद्दल आताच काही बोलणे योग्य होणार नाही असे नाव न छापण्याच्या अटीवर इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

मंगळ मोहिमेमुळे मंगळ ग्रहासंबंधी माहितीचा खजिना उपलब्ध झाला आहे. ब्यालालु आणि इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमधील वैज्ञानिकांनी मंगळयानातील उपकरणे तयार केली होती.

विक्रम लँडरबरोबर आता कधीच संपर्क होऊ शकत नाही
चंद्रावर रात्र सुरु झाल्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरबरोबर आता पुन्हा कधीच संपर्क प्रस्थापित होऊ शकणार नाही. कारण विक्रम लँडर आणि त्यातल्या प्रग्यान रोव्हरचे आयुष्यच १४ दिवसांचे होते. चंद्रावर रात्रीच्या वातावरणात तग धरण्याच्या दृष्टीने या उपकरणांची निर्मिती करण्यात आलेली नव्हती. चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला.