कर्नाटकच्या कोडागू येथील एका नऊ वर्षीय मुलीने लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्राची दखल पोलिसांनी घेतले आहे. या पत्रामध्ये त्या मुलीने तिच्या आईचा हरवलेला मोबाईल शोधून देण्याची विनंती केली आहे. त्या मुलीच्या आईचा १६ मे रोजी करोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर ती अनाथालयामध्ये राहत आहे.

कोडागुच्या कुशनगरमधील रहिवासी असणाऱ्या हृतिकक्षाने स्थानिक उपायुक्त, आमदार आणि जिल्हा कोविड रुग्णालयाला हे पत्र लिहिले आहे.

“माझ्या वडीलांची आणि आईची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. माझ्या आईची तब्येत बिघडल्याने तिला माडिकेरी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझे वडील व मी घरी होतो आणि त्यावेळी बाहेर जाऊ शकलो नाही,”

“माझे वडील रोजंदारीवर कामाला आहेत आणि आम्ही शेजार्‍यांच्या मदत केल्यामुळे आता हा दिवस पाहू शकत आहे. माझ्या आईचे १६ मे रोजी निधन झाले. माझ्या आईचा मोबाईल फोन तिच्याबरोबर असणाऱ्या कोणीतरी घेतला आहे. मी आईला गमावल्याने मी अनाथ झाले. त्या फोनमध्ये माझ्या आईच्या बर्‍याच आठवणी आहेत. मी विनंती करतो की ज्यांनी फोन घेतला आहे किंवा ज्यांना सापडला असेल त्यांनी तो अनाथलामध्ये परत आणून द्या,” अशी विनंती हृतिकक्षाने पत्रातून केली आहे.

“माझी पत्नी टी के प्रभाचे १६ मे रोजी करोनाने निधन झाले. तिचे इतर सामान आमच्याकडे दिले आहे. पण तिचा मोबाईल त्यातून गायब आहे. आम्ही त्या नंबरवर बर्‍याच वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद आहे. हृतिकक्षा आईचा मोबाईल न मिळाल्याने सारखी रडत आहे. हृतिकक्षाने आमच्या कुटुंबाच्या अनेक आठवणी त्या फोनमध्ये सेव्ह केल्या आहेत. तिने तिच्या आईचा फोन वापरुन ऑनलाईन वर्गात शिक्षण सुद्धा घेतले होते. आता तो फोन शोधणे किंवा तिचा नवीन फोन खरेदी करणे मला शक्य वाटत नाही,” असे हृतिकक्षाचे वडील नवीन कुमार यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले.

दरम्यान, त्या मुलीची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी पोलिसांना त्वरित कारवाई करण्याची विनंती केली. यावर कर्नाटकचे डीजी आणि आयजीपी प्रवीण सूद यांनी आम्ही शोधण्याचा आमचा प्रयत्न करू असे सांगितले आहे.