देशभरात सध्या करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. सध्या लॉकडाउनचा कालावधी हा ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाउन दरम्यान कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. तर काही ठिकाणी लॉकडाउनमुळे अडकलेले लोक आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. परंतु अशा परिस्थितीत काही विचित्र घटना घडत असल्याचं समोर आलं आहे. बायको माहेरी अडकली म्हणून एका व्यक्तीनं रागाच्या भरात आपल्या प्रेयसीसोबत संसार थाटल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे.

बिहारमधील पाटण्यात राहणाऱ्या धीरज कुमार याची पत्नी आपल्या माहेरी गेली होती. परंतु ती परतण्यापूर्वीच देशात लॉकडाउनचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. म्हणून तिला आपल्या सासरी परत येता आलं नाही. तसंच कोणतीही जोखीम न पत्करता तिनं आपल्या माहेरीच राहण्याचा निर्णय घेतला. परंतु याच कालावधीत तिच्या पतीनं ती घरी येत नसल्यानं रागाच्या भरात आपल्या प्रेयसीशी संसार थाटला.

लॉकडाउमुळे प्रवासासाठी कोणतंही साधन उपलब्ध नसल्यानं त्याच्या पत्नीला सासरी येता आलं नाही. यावेळी धीरज कुमार यानं आपल्या पत्नीला घरी येण्यास सांगितलं. परंतु तिनं नियम मोडून घरी येण्यास नकार दिला. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला आणि आपल्या घराजवळ राहणाऱ्या आपल्या प्रेयशीसी लग्न केलं. त्यानंतर तो तिच्यासोबतच आपल्या घरात राहू लागला. काही दिवसांनी ही गोष्ट त्याच्या पत्नीला समजली. त्यानंतर त्याच्या पत्नीनं त्वरित पोलीस ठाणं गाठलं आणि आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. सध्या धीरज कुमार याला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.