सध्या सोशल मीडियावर विश्वसुंदरीचा किताब पटकावणाऱ्या भारताच्या मानुषी छिल्लरची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. तिने ‘मिस वर्ल्ड’ची स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्यावर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. मात्र, यावेळी मानुषीबाबत मजेशीर टिप्पणी करायला गेलेल्या काँग्रेस नेते शशी थरूर यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. याबद्दल शशी थरूर यांनी जाहीर माफी मागत टीकाकारांनी शांत राहण्याचा सल्ला दिला होता. आता टीकाकारांनी थरूर यांचा सल्ला कितपत मनावर घेतला हे माहिती नाही. मात्र, स्वत: मानुषी छिल्लरने हा सल्ला प्रमाण मानून हा वाद संपवला आहे. तिने ट्विट करून म्हटले आहे की, जग जिंकणारी मुलगी दुसऱ्यांच्या फुटकळ बोलण्याने निराश होणार नाही. ‘चिल्लर’ ही केवळ एक शाब्दिक कोटी होती. तेव्हा ‘Chhillar’ मध्ये असणारा ‘Chill’ विसरू नका, असे सांगत मानुषीने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.