वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी व आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० मालिकेत महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान न मिळाल्याने धोनीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावरही धोनीला संघात स्थान न मिळाल्याची चर्चा रंगली असून ‘ही धोनी पर्वाची अखेर आहे का?’, असा सवाल धोनीच्या चाहच्यांनी विचारला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धची टी – २० मालिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी – २० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. संघात धोनीला स्थान देण्यात आलेले नसून निवड समितीने धोनीऐवजी ऋषभ पंतवर विश्वास दाखवला आहे. धोनीला संघात स्थान न मिळाल्याने धोनीच्या चाहत्यांना धक्काच बसला. याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटू लागले. ट्विटरवर रात्री #Dhoni ट्रेंडिगमध्ये असून ही धोनी पर्वाची अखेर आहे का?, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.

धोनीला संघात स्थान न दिल्याने मला धक्का बसला आहे. यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहीये. धोनी फक्त टी – २० आणि वन डे सामन्यातच खेळताना दिसायचा. आता त्यांनी तिथूनही धोनीला काढून टाकले, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली.

धोनी आम्ही टी- २० मध्ये तुला मिस करु, असे अनेकांनी म्हटले आहे.

धोनी नाही तर टी – २० सामनेच पाहणार नाही, असेही काही युजर्सनी सांगून टाकले.

तर काहींनी यावरुनही बीसीसीआयची फिरकी घेतली, तर काहींना यातही सेक्रेड गेम्सच्या गायतोंडेची आठवण झाली.

दरम्यान, विंडीज व ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेसाठी बीसीसीआयने नवोदीत खेळाडूंना संधी देण्याचं ठरवल्याचे दिसते. कृणाल पांड्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० संघात तर गेल्या काही सामन्यांत स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या शाहबाज नदीमला विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात जागा मिळाली आहे.