पु.ल.देशपांडे म्हटले की महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांचे मन अभिमानाने फुलून येते. या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे गारुड आजही मराठी माणसाच्या मनावर कायम आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या कथा, कादंबऱ्या, नाटक यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. मराठी साहित्यामध्ये विनोदाला एक वेगळे स्थान देण्यात पु.लं. यांचा मोठा वाटा आहे. कोणत्याही विषयावर नेमका विनोद करण्यात पु.लं यांचा हात कोणीच धरु शकत नव्हते आणि आजही शकणार नाही. तरुण वर्गात पु.लं. यांचे किस्से आणि ऑडियो अतिशय आवडीने वाचले आणि ऐकले जातात. असेच काही किस्से खास त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने. पु.लं.च्या ओळखीच्या एका मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले “बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो”. पु.लं.च्या “उरलंसुरलं” ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद ” मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा आवाज लगेच खाली आणण्याचं एक शास्त्र सांगतो. त्यांनी तिकडे भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ‘प्लीज जरा मोठ्याने बोलता का?' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज खाली येतो की नाही बघ.” एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली. बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलून गेले. “तुमच्या घरी काय, तुम्ही आणि सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार”. यावर गंभीरपणे पु.लं.ही त्यांना म्हणाले. “तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच चित्र सारखं असतं का हो?” एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला, तो त्यांचा चाहता होता. तो म्हणाला की, माझी फक्त दोन व्यक्तींवर श्रद्धा आहे, एक ज्ञानेश्वर आणि दुसरे तुम्ही. माझ्या खोलीत मी ज्ञानेश्वरांच्या फोटोसमोर तुमचाही फोटो ठेवलाय. तर पु.लं. म्हणाले “अहो असं काही करु नका नाहीतर लोक विचारतील, ज्ञानेश्वरानी ज्यांच्याकडून वेद म्हणवूनन घेतले तो रेडा हाच का?” नाशिकला कॉलेजच्या स्नेहसंमेलनात केलेले धमाल भाषण. या भाषणात पुलं म्हणाले होते, ‘मी आज सकाळीच तुमच्या कॉलेजच्या मुलीला विचारले, तुम्हाला ज्ञानेश्वरांचे काय काय आहे? त्यावर ती म्हणाली, ‘ १० मार्कांचा ज्ञानेश्वर आहे’ मी पुढे विचारणार होतो की, ‘माझे साहित्य किती आहे?” पण पहिल्या उत्तराने मला माझा प्रश्न विचारण्याचा धीर झाला नाही. कारण ज्ञानेश्वरच १० मार्कांचा तर मला एक लक्षांश मार्क असेल की नाही कोणास ठाऊक!” एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले,” आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!” एकदा वसंतराव देशपांडे पु.लं.ना म्हणाले, ही मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे. त्यावर पु.लं. लगेच म्हणाले म्हणूनच मी गळ्यात बांधून घेतलंय. एकदा एक कदम नावाचे गृहस्थ पु.लं.कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले. त्यावर पु.लं.नी त्यांना खास आपल्या शैलीत आशीर्वाद दिला.'कदम कदम बढाये जा.'