काँग्रेसच्या राष्ट्रीय सचीव प्रियंका गांधी यांनी एका मार्मिक गोष्ट शेअर करत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाराणसीमधील डॉक्टरांशी संवाद साधला. त्यावेळी करोनामुळे मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहताना मोदींचा कंठ दाटून आला. यानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो, प्रतिक्रिया आणि व्हिडीओ व्हायरल झालेत. भाजपा समर्थक आणि विरोधक या घटनेवर आपआपल्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रियंका यांनी मागील काही आठवड्यांपासून व्हायरल होणाऱ्या एका पोस्टच्या आधारे लिहिण्यात आलेली पोस्ट शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

मागील काही आठवड्यांपासून देशातील परिस्थितीची तुलना काहींनी टायटॅनिक या इंग्रजी चित्रपटातील जहाजाच्या परिस्थितीशी केली. अनेकांनी या जहाच्या कॅप्टनची आठवण करुन देणाऱ्या पोस्ट मागील काही आठवड्यांमध्ये केल्यात, जहाज बुडत होतं, लोकं मरत होती तरी पांढऱ्या दाढीवाला कॅप्टन सर्वांशी खोटं बोलत होता, अशा मजकुरासहीत फोटो शेअर करत सध्या भारतात निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपहासात्मक पद्धतीने भाष्य करत आहेत.

ट्विटरवरही हाच फोटो अनेकांनी शेअर केलाय. मुळात ऑक्सिजनची कमतरतेसंदर्भातील समस्येनंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून या फोटोची सोशल नेटवर्किंगवर चर्चा होती. अनेकांनी हा फोटो आधीही शेअर केलाय.

१)

२)

३)

४)

याच व्हायरल फोटोचा आधार घेत प्रियंका गांधी यांनी काहीशी समान कथानक असणारी एक उपहासात्मक गोष्ट शेअर करत पंतप्रधानांवर निशाणा साधालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कंठ दाटून आल्याच्या घटनेनंतर प्रियंका यांनी याच व्हायरल फोटोच्या आधारे लिहिण्यात आलेली आणि व्हायरल झालेली एक पोस्ट शेअर केलीय. प्रियंका यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे पाहूयात…

“कोणीतरी मला एक गोष्ट लिहून पाठवली आहे. विचार केला की तुमच्यासोबत ती शेअर करावी.

एक जहाज वादळामध्ये अडकतं. अनेकजण सर्वांच्या डोळ्यासमोर या वादळामध्ये बुडून जातात. इतर अनेक त्या वदळात बुडण्याची भीती असते. जहाजामधील लोक, जहाजातील लहान-मोठे सर्व कर्मचारी ते जहाज बुडण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करु लागतात. परिस्थिती खूप भयंकर होते तरी लोक एकमेकांना धीर देत हिंमत देत काम करतात. जहाजाचा कॅप्टनही जहाज वाचवण्यासाठी प्रयत्न करत असेल असा सर्वांचा विश्वास होता. जेव्हा परिस्थिती आणखीन बिघडू लागली तेव्हा लोकांनी जहाजाच्या कॅप्टनला आवाहन केलं. मात्र त्यांना धक्का बसला जेव्हा जहाजाचा कॅप्टन जागेवर नसल्याचं त्यांना समजलं. अनेकांनी आवाज दिले, आवाहनं केली मात्र तो कॅप्टन आपली जबाबदारी असणारी खुर्ची सोडून कुठेतरी निघून गेला होता.

मात्र लोक, छोटे-मोठे कर्मचारी निराश झाले नाहीत. ते बचावकार्य करत राहिले. त्यांनी आपले अनेक सहकारी गमावले. त्यांच्या ओळखीचे अनेकजण त्यांच्यासमोर बुडाले. त्यानंतर चौकशी केली असता जहाजाच्या कॅप्टनला आधीच वातारवणामध्ये बदल झाल्याची माहिती मिळाली होती. जहाज बुडू शकतं असंही समजलं होतं. मात्र जहाजाच्या कॅप्टनने जहाजातील लोकांना ना वेळेवर इशारा दिला, ना जहाजातील लोकांच्या सुरक्षेसाठी काही संरक्षणाच्या उपाययोजना केल्या. तसेच कॅप्टनने जहाजाचे सुरक्षा कवच अधिक मजबूत करण्याचाही प्रयत्न केला नाही. इतकच नाही तर कॅप्टनने जहाजाच्या सुरक्षेसाठी लागणारं सामानही इतर जहाजांना दिलं.

बराच वेळ जहाजातील कर्मचारी वादळाशी तोंड देत होते. सर्वांच्या प्रयत्नाने परिस्थिती थोडी नियंत्रणामध्ये आली. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अचानक कॅप्टनचा आवाज संपूर्ण जहाजामध्ये ऐकू येऊ लगाला. कॅप्टन अचानक जहाजावरील स्पीकरवरुन घोषणा देऊन लागला. एकदा तर त्याचा आवाज अडकला आणि तो रडू लागला. जहाजावर अडकलेले लोकही तेव्हा त्रासलेले होते. त्यांना कॅप्टनचा आवाज येत तर होता मात्र तो फार दुरून आणि फार वेगळाच येत होता. एकमेकांची मदत करण्यामध्ये सगळेच व्यस्त होते कारण जीव वाचवणं अजूनही महत्वाचं होतं. सर्वजण एकमेकांना मदत करण्याच्या कामात व्यस्त होते. या गोंधळात कोणाला कळालंही नाही की कॅप्टन पुन्हा येऊन आपल्या सीटवर बसला होता.”

प्रियंका यांनी शेअर केलेल्या या पोस्टला १३ हजार लाइक आणि तेराशेहून अधिक शेअर मिळालेत.