रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबनी कायमच चर्चेत असतात. नुकतेच त्यांच्या रिलायन्स इंडिया लिमिटेडनं फ्युचर समुहाचं अधिग्रहण केलं. फ्युचर समुहाचं बिग बाझार आता रिलायन्स समुहाचं म्हणून ओळखलं जाणार आहे. आपल्या या यशामागे आपल्या वडिलांचा हात असल्याचं मुकेश अंबानी सतत सांगतात. नुकतेच सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये आपले वडिल धीरुभाई अंबानी शिस्तप्रिय असल्याचे ते सांगताना दिसत आहे. २००२ मध्ये सिमी गरेवाल यांनी मुकेश अंबनी यांची मुलाखत घेतली होती. लहानपणी आपण केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून आपल्या वडिलांनी दोन दिवस दोन्ही भावंडांना गॅरेजमध्ये बंद करून ठेवलं होतं आणि जेवणासाठी केवळ चपाती, पाणी देण्यात येत होतं, असं ते एका व्हिडीओत सांगताना दिसत आहेत. मुलाखतीदरम्यान सिमी गरेवाल यांनी मुकेश अंबानी यांना त्यांच्या बालपणाबद्दल आणि बालपणीची एक आठवण याबद्दल प्रश्न विचारला. "लहानपणी आम्ही आमच्या वडिलांचा संघर्ष जवळून पाहिला आहे. धीरुभाई अंबानी हे अतिशय शिस्तप्रिय होते. आमच्याकडे एके दिवशी काही नातलग आले होते. त्यावेळी लहान मुलांबरोबर आम्ही भावंडांनी खुप मस्ती केली. आमची आई जोपर्यंत नातलगांसाठी काही खाण्यासाठी आणेल त्यापूर्वीच आम्ही दोघांनी ते खाऊन टाकलं," असं मुकेश अंबानी आठवण सांगताना म्हणाले. "त्यानंतर वडिलांनी रागानं आम्हाला मस्ती न करता बसायला सांगितलं. परंतु आम्ही त्यांचं ऐकलं नाही आणि मस्ती करत राहिलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या वडिलांना संताप अनावर झाला आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला दोन दिवस गॅरेजमध्ये बंद राहण्याची शिक्षा दिली. जोपर्यंत तुम्ही नीट वागणं शिकणार नाहीत आणि जे काही केलं त्याबद्दल तुम्हाला समजणार नाही तोवर तुम्हाला घरात घेणार नाही," असंही धीरूभाईंनी सांगितल्याचं ते म्हणाले. आईच्या सांगण्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही आणि आम्हाला केवळ चपाती आणि पाण्यासह दोन दिवस गॅरेजमध्ये काढावे लागले होते अशी आठवण मुकेश अंबनी यांनी सांगितली.