मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना रजा देणं हा ट्रेंड सुरु झाला असून पत्रकार बरखा दत्त यांनी याला विरोध दर्शविला आहे. महिलांना दर महिन्याला पाळीच्या पहिल्या दिवशी सुटी देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिलांना जास्त प्रमाणात शारीरिक त्रास होतो. तसेच त्यांची मनोवस्थाही ठिक नसल्याने ही सुटी देण्यात यावी अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. याला प्रतिसाद देत काही मीडिया कंपन्यांनी ही सुटी देण्यास सुरुवातही केली. मात्र अशाप्रकारे महिला असल्याची सूट घेत सुटी मागणे योग्य नाही असे बरखा दत्त यांनी म्हटले आहे.

नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी आपण स्त्री आहोत म्हणून सूट घेणे याबाबत अनेक मतमतांतरे समोर आली आहेत. मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास हा स्त्रीनुसार बदलतो. काहींना पहिल्या दिवशी जास्त त्रास होतो तर काहींना दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही त्रास होतो. बरखा दत्त यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये ‘मी स्त्रीवादी आहे, महिलांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुटी देणे ही अतिशय वेडगळ कल्पना आहे.’ अशा शिर्षकाखाली लेख लिहीला आहे. महिलांना मंदिरप्रवेश तसेच नमाजसाठी करण्यात येणारा विरोध या मुद्द्यापासून त्या आपल्या लेखाला सुरुवात करतात.

टोकावरच्या समाजाचे वर्तमान..

मासिक पाळी ही नक्कीच त्रासदायक आणि अस्वस्थ करणारी असते. मात्र त्यासाठी सुटीची आवश्यकता नसून एक पेनकीलर त्यासाठी पुरेशी असते. फारतर एखादी गरम पाण्याची बाटली. पण मागील काही वर्षात अनेक गोष्टी बदललेल्या असून महिलांचे कामाचे स्वरुप, त्यांची जीवनशैली यामध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. मात्र मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुटी मागून महिला आपल्या महिला असण्याचा गवगवा करत नाहीत ना हे तपासून पाहायला हवे. त्यामुळे असाप्रकारचा स्त्रीवाद आता थांबवायला हवा असेही दत्त यांचे म्हणणे आहे.

मासिक पाळीच्या त्या पाच दिवसांत होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक त्रासातून प्रत्येक महिला जात असते. पाय, कंबर पोटात दुखणं, चालण्यास त्रास होणं, शारीरिक आणि मानसिक थकवा त्यामुळे होणारे मूड स्विंग्स अशा अनेक गोष्टींचा त्रास तिला होत असतो. असे विषय चारचौघांत सांगणंही अनेकींना सोयीचं वाटत नाही. त्यातून वर्किंग वूमनच्या बाबतीत ही समस्या तर अधिक गंभीर आहे. आपल्याला होणारा त्रास खुलेपणाने सांगता येत नाही तेव्हा मासिक पाळीच्या काळात महिला आजारी असल्याचे कारण सांगून कार्यालयात अनुपस्थित राहतात. तेव्हा ही समस्या समजून घेऊन मुंबईतल्या ‘कल्चर मीडिया’ने महिलांना मासिक पाळीची सुट्टी देऊ केली होती यापासूनच प्रेरणा घेऊन ‘मातृभूमी’ने हा निर्णय घेतला होता. मासिक पाळीच्या दिवसांत रजा देणारी ‘कल्चर मीडिया’ही भारतातील पहिलीच कंपनी होती.