क्रांतिकार्यात बलिदानासाठी सर्वात पुढे असणारा असा नेता, निधड्या छातीने हौतात्म्याला सामोरा जाणारा ‘देशभक्त’, ‘प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी’, ‘जहाल क्रांतिकारक’ अशी भगत सिंग यांची ओळख आजही आपल्या मनात कायम आहे. भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रजांविरुद्ध बंड करुन ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन. पी. सॅण्डर्सची हत्या केल्याप्रकरणी २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उटलं त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली. शहीद भगत सिंग यांची आज जयंती आहे तेव्हा शहीद भगत सिंग जयंतीनिमित्त फार क्वचित ऐकलेल्या त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

– तरुण वयातच आपल्या कार्याची दिशा त्यांना पक्की ठाऊक होती, ते बंडखोर होतेच पण जगातल्या सगळ्या दु:ख-दैन्याबाबत त्यांच्या मनात करुणाही होती म्हणूनच त्यांची ओळख क्रांतीकारी शहीद भगत सिंग बरोबरच एक उत्तम द्रष्टा, करुणा बाळगणारा मानवतावादी अशीही केली जाते. स्वत:वरील खटल्याचा वापर क्रांतीच्या प्रसारासाठी करणारा मुत्सद्दीपणाही त्यांच्या अंगी होता. वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी देशासाठी त्यांनी हसत हसत बलिदान दिलं.

– भगत सिंग यांची वाचनाची आवड इतकी प्रचंड होती की त्यांना फाशी देण्याआधी त्यांचे वकील प्राण नाथ मेहता यांनी आणलेलं पुस्तक त्यांनी भरभर वाचायला सुरूवात केली. त्यांच्या या पुस्तकवेडानं प्राण नाथ मेहताही अचंबित झाले होते.

– पुस्तक वाचनातून त्यांना ज्या काही गोष्टींची नव्यानं माहिती मिळत, समजत होती त्याची ते टिप्पणी तयार करत. तुरुंगात असताना त्यांनी काही पुस्तकं लिहिली होती. ‘द हिस्ट्री ऑफ द रिव्होल्युशनरी मूव्हमेंट ऑफ इंडिया’, ‘द आयडियल ऑफ सोशॅलिझम’, ‘ऑटोबायोग्राफी’ आणि ‘अ‍ॅट द डोअर ऑफ डेथ’ ही चार पुस्तकं लिहिली होती.

– दिल्ली असेंब्लीत बॉम्ब टाकण्यासाठी जाताना भगतसिंहांना माहीत होते की, आपण आता परत येणार नाही. तेव्हा त्यांनी आपले नवे बूट भेट म्हणून आपले सहकारी जयदेव कपूर दिले होते आणि त्याची जुनी पादत्राणे स्वत: घातली होती.