स्वरा भास्कर म्हणजे सध्याच्या फिल्मी दुनियेतली अशी व्यक्ती जी प्रत्येक मुद्यावर स्वतःचं अगदी परखड आणि रोखठोक मत मांडत असते. ट्विटरवर ती बऱ्याच प्रमाणात सक्रिय असते आणि परखड मतांमुळे अनेकांशी तिचे वाद होत असतात. लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील स्वरा भास्कर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. बिहारच्या बेगुसरायमध्ये कन्हैय्या कुमार आणि दिल्लीत आम आदमी पक्षाच्या प्रचारसभेमध्ये स्वरा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यामुळे तिला अनेकदा मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नुकतीच स्वरा परदेशातून परतली असून ती पुन्हा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालीये.

झारखंडमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या तबरेज अन्सारी प्रकरणावर तिने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. तसंच या हत्येविरोधात 26 जून रोजी दिल्लीत कँडल मार्चमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन तिने ट्विटरद्वारे केलं होतं. नेहमीप्रमाणे तिला यावरुन ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. विपूल अग्रवाल नावाच्या एका आयपीएस अधिकाऱ्याने स्वराच्या ट्विटला रिप्लाय केला आणि ‘स्वरा तू काही निवडक लोकांसाठीच तुझे स्वर वापरतेस हे तू पुन्हा सिद्ध केलंय’ असं ट्विट करुन तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर स्वरानेही रोखठोक उत्तर दिलं. ‘सर, मी एक अभिनेत्री आहे…मी निवडक असल्याने किंवा नसल्याने कोणाला काही नुकसान होणार नाही…  पण तुम्ही आयपीएस अधिकारी आहात…तुम्ही निवडक असाल तर देशाला नुकसान पोहोचते…आणि नंतर त्यामुळे तबरेज अन्सारी सारख्या घटना जन्माला येतात…त्यामुळे मला ट्रोल करण्याऐवजी कृपया स्वतःचं काम करा…किमान ज्या भारतीय संविधानाची शपथ घेतली, त्याच्यासाठी तरी आवाज उठवा’ असं सडेतोड उत्तर स्वराने दिलं आहे. तिचं हे उत्तर नेटकऱ्यांना चांगलंच पसंतीस पडलं असून अनेकांनी या आयपीएस अधिकाऱ्यालाच खडेबोल सुनावले आहेत.


संतप्त जमावाने तबरेज अन्सारी याला गेल्या 19 जून रोजी चोरी केल्याच्या संशयावरून सेराईकेला-खारसावान जिल्ह्यात पकडून खांबाला बांधले व जबर मारहाण केली होती. त्यानंतर 22 जून रोजी त्याचा मृत्यू झाला होता. अन्सारी याला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’ म्हणण्याची सक्तीही जमावाने केली गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसले होते.