विवाह मंडपात अचानक गर्लफ्रेंड आल्यामुळे लग्न मोडल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या ऐकल्या असतील. मात्र, छत्तीसगडमध्ये विवाहमंडपात अचानक गर्लफ्रेंड येते..त्यानंतर तिथे गोंधळ,हाणामारी किंवा राडा काहीच होत नाही…तेथील लोकांनी अतिशय समजूतदारपणे नवरा, नवरी आणि प्रेयसीचं अनोख लग्न लावून दिलं..

हा अनोखा विवाह सोहळा छत्तीसगढच्या दंतेवाडातील मुचनार गावात झाला आहे. येथील बीरबल नाग नावाच्या व्यक्तीचं प्रतिभा नावाच्या मुलीबरोबर लग्न होतं. लग्नाला सुरूवात होताच बीरबलची प्रेयसी सुमनी मांडवात पोहचली. सुमनी आणि बिरबल यांचं एकमेकांवर अतोनात प्रेम. लग्नामध्ये अचानक गर्लफ्रेंड पोहचल्यावर हाणामारी, गोंधळ, भांडणं होतातच. मात्र, गावकऱ्यांनी आणि कुटुंबियांनी समजुतदारपणे हे प्रकरण सोडवलं. त्यांनी बिरबल, प्रतिभा आणि सुमनी या तिघांचं लग्न लावून दिलं.

स्थानिक प्रसारमाध्यांच्या वृत्तानुसार, दोन वर्षांपूर्वी बिरबल आणि सुमनीच्या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध होता. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण घरातील विरोधामुळे झालं नाही. दोन वर्षानंतर बिरबल प्रतिभाशी लग्न करण्यास तयार झाला. दोघांचे लग्न होणार म्हणताच तिथे सुमनीची एन्ट्री झाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं. पोलीस स्टेशनमध्ये नवरी, नवरदेव , प्रेयसी आणि नवरदेवाच्या कुटुंबियामध्ये चर्चा झाली. त्यावेळी प्रतिभा आणि सुमनने एक पती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. याला समाजाच्या प्रमुखांनी देखील विरोध दर्शवला नाही. त्यानंतर त्यांचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात लावून देण्यात आलं.