– स्वप्निल घंगाळे

“पत्र हे पावसाच्या थेंबासारखं असतं ते कुठली ना कुठली भावना रुझवतंच… लोक वेड्यासारखी वाट पाहतात पत्राची”

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी

जागतिक टपाल दिन म्हणजेच हॅशटॅगच्या भाषेत सांगायचं तर #WorldPostDay निमित्ताने लिहीत असणाऱ्या या विशेष ब्लॉगची सुरुवात करायला या वरील वाक्यापेक्षा छान वाक्य कोणते असू शकेल नाही? हे वाक्य गजेंद्र आहिरे दिग्दर्शीत आणि गिरीश कुलकर्णी यांनी पोस्टमनची भूमिका साकारलेल्या पोस्टकार्ड या सिनेमातील आहे. पोस्टाबद्दल, पत्राबद्दल लिहायचं ठरलं आणि तेव्हापासूनच डोक्यात या वाक्याने पोस्टला सुरुवात करायचं असं झालं. असो तर

‘‘पत्र हे पावसाच्या थेंबासारखं असतं ते कुठली ना कुठली भावना रुझवतंच…’’

या वाक्यावरच कित्ती काय काय लिहू शकतो नाही का? पण खरचं पत्र पावसासारखंच असतं. दोघेही येणार म्हटल्यावर आपण त्यांची आतुरतेने वाट पाहतो. अगदी वेड्यासारखी! प्रचंड भाव खातात ते अशावेळी, पण एकदा आले की मग बोली भाषेत सांगायचं झालं तर समोरच्याला एकदम फ्लॅट करुन टाकतात. मनातला एखादा किंवा कधीतरी अनेक कप्प्यांमध्ये एकाच वेळेस डोकवून जातात दोघे. पत्र हे खरंच पावसाच्या थेंबासारखं असतं. पावसाचा थेंब जसा जमिनीवर पडल्यावर काही नाही तरी जमीन भिजवण्याचं काम करतो तसंच पत्रावरील शब्द न् शब्द आपल्यातला माणूस जागा करतो. दोघेपण तसे सेमच असतात. एक ढगातल्या पाण्याला वाट मोकळी करुन दोतो तर पत्र मानातल्या भावनांना. पाऊस असा मोजता येत असला तरी त्याच्याशी जुळलेल्या भावना अर्मायदित आहे तसंच पत्राचं दिसतं एवढसं असलं तरी त्याच्या आकारापेक्षा बरंच काही सांगून जातं ते. पाऊस आणि पत्र वाचताना डोळ्यांबरोबरच मनाची दारे उघडी ठेवली पाहिजे म्हणजे दोघांमधील आक्षय मानात ओलावा निर्माण करतो आपलेपणाचा आणि आपण जास्त कनेक्ट होतो त्या पावसाशी आणि पत्राशीही.

पत्राचा आणि आमचा (म्हणजे ९०च्या दशकातील शाळकरी पोरं) पहिला औपचारीक संबंध आला आठवीत असताना. आठ मार्कांसाठी पत्र लिहा ऑप्शन होता तेव्हा. पण माझ्या सारख्या काहीजणांचा या डिजिटल युगाआधी खरोखर पत्राशी संबंध आला तो संवादाचे माध्यम म्हणून. म्हणजे बाबा किंवा कोणीही नातेवाईक बाहेर गावी किंवा दुसऱ्या शहरात असणाऱ्या मुलांचा पत्राशी संबंध आला तो लिहीता वाचता यायला लागले तेव्हापासून. माझं सांगायचं झालं तर मी आठ वगैरे वर्षांचा असताना.

बाबा परदेशात गेले तेव्हा त्यांनी पाठवलेलं पहिलं पत्र. आकाशी रंगाच्या पत्राला गडद निळ्या आणि लाल रंगाच्या रेषांची बॉर्डर त्यावर त्यांच्या देशातील एक स्टॅम्प गरुडाचं चिन्ह असणारा आणि आपला एक गांधीजींचा फोटो असणारा स्टॅम्प. ते पत्र आईने वाचलं तेव्हा माझ्या डोळ्यातला पाऊस गालावरच्या पठारावर धावू लागला. मग तो डोळ्यातला पाऊस थांबवण्यासाठी आईने मला फिरायला नेलं मनातलं वादळ शांत होईपर्यंत आम्ही घरी गेलो नव्हतो ते पहिलं पत्र आलं बाबांचं तेव्हा. कदाचित हा असला भन्नाट अनुभव स्वत: जगलो असल्यानेच ‘‘पत्र हे पावसाच्या थेंबासारखं असतं ते कुठली ना कुठली भावना रुझवतंच…’’ या वाक्याशी मी जास्त कनेक्ट झालो असेल. तुम्हीही याच अशा पत्रवाले पिढीतले असाल तर नक्की तुम्हीही कनेक्ट व्हाल अगदी स..ह..ज…

पत्र हल्ली आधी इतकी राहिली नाहीत संख्येनेही आणि भावनांनी भरलेलीही. त्यामुळे आजच्या डिजीटल जमान्यात तुम्हाला कोणी आवर्जून पत्र लिहीत असेल तर तुम्ही स्पेशल आहात हे लक्षात ठेवा. मी स्वत: अनेकदा जवळच्या मित्रांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून स्वत: त्यांच्यासाठी लिहीलेलं पत्र देतो. पत्र पाहिल्यावर खरचं वेडावतात लोकं हे त्यांचा चेहरा आणि त्यांनी मारलेली मिठी सोडवताना कळतं. पत्र लिहीताना एक बरं असतं समोर बोलू शकेल की नाही याबद्दल आपण स्वत: कॉन्फिडन्ट नसतो तेव्हा कागदावर उतरवलेल्या किंवा आजच्या जमान्यात एमएस वर्डवर टाइप केलेल्या भावना खूप महत्वाचं काम करतात. कितीही संवाद माध्यमे शोधलीत तरी पत्राची किंवा एकंदरितच लिखाण माध्यमाची गोडी इतर कशालाही नाही हे बाकी खरचं. तुम्हाला लिहिताना आणि वाचताना तुमचा स्वत:चा वेळ घेता येतो, समजून हवं तसा अर्थ काढून त्याचे आकलन करता येते. ही लिबर्ट इतर माध्यमे देत नाहीत म्हणजे गाणं ऐकताना किंवा भाषण ऐकताना वक्त्याच्या वेगाबरोबर रहावं लागतं नाहीतर आपली गाडी सुटते. तेच सिनेमाचं होतं.

आमच्या म्हणजे ‘९० स किड्स’च्या काळातही पत्र लिहून देण्याची प्रथा होती अस्तित्वात. हो म्हणजे मी स्वत: त्या लाल पेटींमध्ये पत्र टाकलीयत, अगदी हात पुरत नसतानाही टाचा उंच करुन त्या पत्रपेटीच्या तोंडात हात घालून पत्र अडकलं तर नाहीय ना तेही चेक केलयं. तेव्हा प्रेमपत्रे व्हॉट्सअप किंवा पीएम केली जात नव्हती. तेव्हाच्या प्रेमपत्रांबरोबर अॅडव्हेंचर फ्री यायचं. हो खरचं, म्हणजे ते पत्र दुसऱ्या कोणाला मिळालं तर?, तिने ते वाचलंच नाही तर? अशा अनेक जर-तरच्या लॉट्रीत लागायचं ते प्रेम. कारण त्याकाळी प्रेमपत्र पोहचल्याची ब्ल्यू टीक किंवा लास्ट सीन वगैरे सिस्टीम नव्हती.

प्रेमपत्र वजा करुन साध्या पत्रांबद्दल बोलायचं झाल्यास पोस्टमन काकांना पाहिलंय मी पत्र द्यायला याचे तेव्हा. हल्ली पण येतात पोस्टमन पण फोन बील, बँकाचे स्टेटमेन्ट आणि बाकीचाच भरणा जास्त असतो. भावानांनी ओथंबून वाहणाऱ्या पत्रांनी त्यांच्या पिशवीला आलेला मायेचा ओलावा संपलाय आणि दुष्काळ पडलाय त्या पिशवीतून बाहेर येणाऱ्या भावानांचाच. पोस्टमनची आपण किंमत करत नाही आपण असं अनेकदा वाटतं अगदी आजही. म्हणजे पावसातही आपली पत्र भिजू न देता ती सहीसलामत पोहचवणाऱा पोस्टमन किती मोठं काम करतो याचा अंदाज याच्यावर बांधता येईल की त्याकाळी लिहीली जाणारी पत्र ओपन म्हणजे एनव्हलप शिवाय असायची. म्हणजे पावसाच एक थेंब पडला तरी अक्षरे पाणीपाणी होत असायची. म्हणजेच का एक पावसाचा थेंब संपूर्ण पत्राचा अर्थ बदलू शकतो हे पोस्टमनला कळाचे. (यावरुन ‘ध’चा ‘म’ झाल्याने झालेला इतिहास आठवला)

पोस्टमन खरच मस्त होते. गावाकडे तर शहरात राहायला आलेल्या पोरांनी पाठवलेली पत्रे त्यांच्या अशिक्षित आई-बापाला पोस्टमनच वाचून दाखवायचे. हो हे खरंच व्हायचं फक्त सिनेमात नव्हतं हे. तसं सिनेमातील ‘कबुतर जा जा जा…’, ‘संदेसे आते है…’, ‘चिठ्ठी आई है आई है…’, ‘लिखे जो खत तुझे…’ अशी अनेक गाणी पत्रामुळे आणि पत्राच्या तेव्हाच्या महत्वामुळे अजरामर झाली. आजच्या काळात अशी गाणी लिहीता येणार नाही. आजच्या संवादमाध्यमांवर गाणी लिहियाची झाली तर ‘नेटवर्क आ… आ… आ…’, ‘व्हॉटसअप पीन आते है…’ ‘पीएम आया है आय है पीएम आया है…’, ‘लिखे जो ईमेल तुझे…’ अशी एकदम टेकसेव्ही गाणी लिहावी लागतील जी बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात अजरामर ऐवजी लगेच मरुन जातील. तुम्हाला नाही वाटतं का असं?

लहापनपणी एक खेळ खेळाचो आपण (अर्थात परत ‘९०स किड्स’) मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं. पण सध्याच्या पत्राची स्थिती पाहता मामाचं नाही आपलचं पत्र हरवलं आहे असं वाटतं. आणि ते अनेकांना सापडत नाहीय. तुम्ही स्वत: कधी लिहीलं होतं शेवटचं पत्र एखाद्याला. बघा नाही सापडतय ना उत्तर. तेच सांगतोय मामाचं नाही आपलचं पत्र हरवलयं.

सगळ्यांमध्ये राहून एकटं राहणाऱ्यांच्या आजच्या जगात एखाद्याने पत्र लिहून द्याचा उद्योग सुरु केला तरी तो खोऱ्याने पैसा खेचेल असं फक्त मलाच वाटतंय की तुम्हीही या मताशी सहमत आहात? असो… हा उद्योग उदयास येईल तेव्हा येईल पण असं अवेळी अचानक आलेल्या पावसासारखं एखाद पत्र अचानक धडकलं ना (हल्ली व्हॉट्सअप किंवा मेसेजवर म्हणा) तर असं मस्त वाटतं अवेळी आलेल्या पावसात भिजल्यावर जो आनंद मिळतो ना तसंच. बघा ट्राय करुन एखाद्यापर्यंत न पोहचवता आलेली गोष्ट व्हॉट्सअपऐवजी पेपर-पेनच्या माध्यमातून पत्रातून पोहचवता येते का!

सर्वांना पुन्हा एकदा जागतिक पोस्ट दिनाच्या पोस्टमन काकांच्या गाठोड्यासारख्या गाठोडभरुन शुभेच्छा… आज एखाद्याला पत्र लिहाच…

swapnil.ghangale@loksatta.com