राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. अनेक दशकांपासून रखडलेल्या या वादावर तोडगा काढत न्यायालयानं केंद्र सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठानं एकमतानं दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा निकाल दिला. हा निकाल आल्यानंतर सोशल मिडियावर वेगवेगळ्या पद्धतीने नेटकरी व्यक्त होताना दिसत आहेत. मात्र यामध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ट्रोल झाल्याचे पहायला मिळत आहे.

खरं तर कोणताही महत्वाचा निकाल आल्यानंतर किंवा देशात काही महत्वाची घटना घडल्यानंतर अक्षय कुमारला नेटकरी ट्रोल करताना दिसतात. अक्षय कुमार हा मागील अनेक वर्षांपासून देशभक्तीपर आणि सामाजिक बांधिलकी जपणारे चित्रपट करतो. त्यामुळेच देशात एखादी महत्वाची घटना घडली की नेटकरी अक्षय कुमारला पुढच्या चित्रपटाची कथा सापडली अशा पद्धतीचे ट्विटस करतात. इस्रोच्या चांद्रयान २ मोहिमेच्या वेळीही अनेकांनी अक्षयला ट्रोल केलं होतं. हाच ट्रेण्ड आता अयोद्ध्या निकालानंतर दिसून येत आहे.

ही काही ट्विटस् आहेत. मात्र अशाप्रकारची शेकडो ट्विटस नेटकऱ्यांनी केली असून या निर्णयावर आधारित अक्षयचा चित्रपट लवकरच सर्वांना पहायला मिळेल असं त्यांच म्हणणं आहे.