करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी देशातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि वैज्ञानिक प्रयत्न करत असले तरी दुसरीकडे काही ठिकाणी करोनासंदर्भातील अंधविश्वासाच्या घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशमधील बुंदेलखंडमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. येथील काही जिल्ह्यांमधील ग्रामीण भागांमध्ये करोना हा देवीचा प्रकोप असल्याचा प्रचार केला जात असल्याचं एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. बुंदेलखंडमधील निवाडी जिल्ह्यामध्ये अशाच समजुतीला बळी पडून शेकडो गावकऱ्यांनी कलश यात्रा काढल्याची माहिती समोर आलीय. शेकडो महिला, पुरुष आणि लहान मुलं टोळ्याटोळ्यांनी हातामध्ये पाण्याचे कलश घेऊन येथील अछरुमाता मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी आणि प्रकोपापासून वाचवण्याची मागणी देवीकडे करण्यासाठी पोहचले. या प्रकरणाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा >> Coronavirus: मृतांच्या नातेवाईकांकडे अंत्यसंस्कारासाठी केली जातेय ७० हजारांची मागणी या कलश यात्रेदरम्यान करोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचं दिसून आलं. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात आलं आहे. अनेकांनी मास्कही घातले नव्हते. करोना निर्बंधांमुळे मंदिर बंद असल्याने गावकऱ्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच अभिषेक केला. एनडीटीव्हीच्या रहिवाशी संपादकांनी यासंदर्भातील व्हिडीओ ट्विट केलाय. अंधविश्वास से कैसे लड़ें? निवाड़ी जिले में बड़ी तादाद में ग्रामीण बच्चों के साथ टोली बनाकर, कोरोना कर्फ्यू का उल्लंघन करते हुए हाथों में जल से भरे लोटे को लेकर प्रसिद्ध देवी क्षेत्र अछरूमाता मंदिर पहुंच गये. पुलिस ने मामला दर्ज कर लिया है pic.twitter.com/eoKcgqjD6j — Anurag Dwary (@Anurag_Dwary) May 20, 2021 करोनापासून वाचण्यासाठी गावकऱ्यांनी देवीकडे प्रार्थना केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं सांगत आहेत. निवाडी जिल्ह्यातील पृथ्वीपूर आणि आजूबाजूच्या गावातील अनेक गावकरी टोळ्याटोळ्यांनी अछरुमाता मंदिराच्या दिशेने चालू लागले. यामध्ये महिला, पुरुष आणि त्याचबरोबर लहान मुलांचाही समावेश होता. पोलिसांनी या लोकांना पृथ्वीपूरजवळच थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी त्यांचं काहीही न ऐकता मंदिराकडे जाणार असल्याचं सांगितल्याने पोलिसही हतबल दिसून आले. मंदिराबाहेर गावकऱ्यांनी गर्दी करु नये म्हणून पोलीस प्रयत्न करत होते, सूचना देत होते मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. यासंदर्भात बोलताना निवाडीचे पोलीस निर्देशक आलोक कुमार सिंह यांनी गावातील कोणत्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन गावकऱ्यांनी कलम १४४ चं उल्लंघन करत मंदिराकडे चालत जाण्याचा निर्णय घेतला. एका गावातून दुसऱ्या गावात मंदिरात चालत जाण्यासंदर्भातील माहिती पोहचल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत.