Chanakya Niti Friendship : प्रत्येकाच्या जीवनात नात्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु ‘मैत्री’ हे एक असे नाते आहे जे माणूस स्वतः निवडतो. भारतीय परंपरा, पौराणिक ग्रंथ आणि नीतिशास्त्रांमध्ये खऱ्या मित्राला आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती मानले गेले आहे. आचार्य चाणक्यांनीही आपल्या चाणक्य निती या ग्रंथात या गोष्टीवर भर दिला आहे की, एक सच्चा मित्र माणसाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकतो, तर वाईट संगती त्याला विनाशाच्या दिशेन घेऊन जाऊ शकतो.

नीतिशास्त्रांनुसार, आयुष्यात तीन प्रकारचे मित्र खूप नशिबानेच मिळतात. जर तुमच्या आयुष्यातही यांपैकी एखादा मित्र असेल, तर त्याची साथ कधीही सोडू नका.

१. मार्गदर्शक मित्र – योग्य मार्ग दाखवणारा

पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मित्र तो आहे, जो संकटाच्या किंवा गोंधळाच्या वेळी तुमचा योग्य मार्गदर्शक बनतो. महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची मैत्री याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धात जेव्हा अर्जुन मोह आणि भ्रमात पडला होता, तेव्हा श्रीकृष्णांनी एक मित्र आणि मार्गदर्शक म्हणून त्याला धर्माचा खरा धडा शिकवला.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जो मित्र तुम्हाला चुकीचा मार्ग, अधर्म, व्यसन किंवा चुकीच्या निर्णयांपासून रोखतो आणि कोणत्याही संकोचाशिवाय तुमच्या चुकांवर तुम्हाला योग्य सल्ला देतो, तो एखाद्या गुरूंपेक्षा कमी नसतो. असा मित्र तुमची चापलुसी करण्याऐवजी तुमच्या चारित्र्याचे आणि भविष्याचे रक्षण करतो.

२. संकटातील सोबती – अडचणीच्या वेळी ढाल बनणारा

चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की, मित्राची खरी परीक्षा कठीण परिस्थितीतच होते. जो व्यक्ती तुमच्या आजारपणात, आर्थिक अडचणीत किंवा कोणत्याही मोठ्या संकटात न बोलावता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तोच तुमचा खरा मित्र आहे.

सुदामा आणि श्रीकृष्णाची पौराणिक कथा या गोष्टीचा पुरावा आहे की, सच्चा मित्र संपत्ती, पद किंवा परिस्थिती पाहून व्यवहार करत नाही, तर तो केवळ प्रेम आणि भावनेचा भुकेला असतो. वाईट काळात तुमची साथ न सोडणाऱ्या मित्राला शास्त्रात ‘रत्ना’समान मानले गेले आहे. अशा मित्राला गमावणे म्हणजे स्वतःची सर्वात मजबूत ढाल गमावण्यासारखे आहे.

३. विश्वासू मित्र – पाठीमागे सन्मानाचे रक्षण करणारा

तिसरा प्रकार अशा मित्रांचा आहे जे पूर्णपणे निश्वार्थी, विश्वासू असतात. खरा मित्र तोच आहे जो तुमच्या गुप्त गोष्टी कोणासमोरही उघड करत नाही आणि तुमच्या पाठीमागे देखील तुमच्या मान-सन्मानाचे रक्षण करतो.

आजच्या काळात असे लोक मिळणे अत्यंत कठीण आहे जे तुमच्यासमोर तुमचे कौतुक करतील आणि इतरांसमोर तुमची निंदा ऐकून घेणार नाहीत. जो मित्र कोणत्याही स्वार्थाशिवाय केवळ तुमचे भले इच्छितो, तो पूर्वजन्मीच्या पुण्यकर्मामुळेच प्राप्त होतो.

शास्त्र सांगते की, संपत्ती, पद आणि भौतिक गोष्टी आयुष्यात वारंवार मिळू शकतात, परंतु विश्वासू, निस्वार्थी मित्र मिळणे हे पूर्णपणे तुमच्या कर्मावर आणि नशिबावर अवलंबून असते. तुमच्याकडेही असा एखादा मित्र असेल जो तुम्हाला योग्य वाट दाखवतो, संकटात पाठीशी उभा राहतो आणि तुमच्या प्रतिष्ठेचे रक्षण करतो, तर त्याचे नाते जपून ठेवा. अशा मित्रांची साथ आयुष्यातील प्रत्येक कठीण लढाई सोपी करते.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)