Keep These Things Secret To Your Friends : आचार्य चाणक्य यांना जगातील सर्वश्रेष्ठ विद्वान आणि कुशल रणनीतीकारांपैकी एक मानले जाते. त्यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे लिहिलेल्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात यशस्वी, सुखी आणि सन्माननीय जीवन जगण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. धर्म, अर्थ, कर्तव्य, नातेसंबंध, राजकारण आणि व्यवहारज्ञान अशा विविध विषयांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले आहे. म्हणूनच शेकडो वर्षांनंतरही चाणक्यांचे विचार आजच्या काळात तितकेच उपयुक्त आणि प्रेरणादायी मानले जातात.

चाणक्यांच्या मते, जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसते, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि काही गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. प्रत्येक व्यक्तीवर सहज विश्वास ठेवणे किंवा मनातील प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर मांडणे अनेकदा नुकसानदायक ठरू शकते. ‘चाणक्य नीती’मध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्या कोणासोबतही शेअर करू नयेत. चला जाणून घेऊया, त्या कोणत्या आहेत…

विश्वसेत्कुमित्रे च मित्रे चापि न विश्वसेत्।
कदाचित्कुपितं मित्रं सर्वं गुह्यं प्रकाशयेत्॥

या श्लोकात आचार्य चाणक्य सांगतात की, वाईट मित्रावर कधीही विश्वास ठेवू नये. इतकेच नव्हे, तर आपल्या मित्रांवरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. कारण – ज्या मित्रावर तुम्ही विश्वास ठेवता. तोच एखाद्या कारणावरून तुमच्यावर रागावला तर तुमचे गुपिते इतरांना रागात सांगू शकतो. म्हणून, तुम्ही तुमची गुपिते नेहमी लपवून ठेवावीत.

मनसा चिन्तितं कार्यं वाचा नैव प्रकाशयेत् ।
मन्त्रेण रक्षयेद् गूढं कार्य चापि नियोजयेत् ।।

या श्लोकात आचार्य चाणक्य सांगतात की, तुम्ही हाती घेतलेले कार्य पूर्ण होईपर्यंत त्याबद्दल एक शब्दही बोलू नये. तुमच्या महत्त्वाच्या कार्याबद्दल इतरांना कळू देऊ नका. अशा प्रकारे केलेले कार्य नेहमीच यशस्वी होते.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)