Chanakya Niti on Parenting: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये जीवन यशस्वी, शिस्तबद्ध आणि सुखी करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये धर्म, अर्थ आणि मानवी वर्तनावर आधारित तत्त्वांचे पालन करून माणूस आपले जीवन यशस्वी करू शकतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये आई-वडिलांच्या कर्तव्यांबद्दलही सविस्तर सांगितले आहे. यात त्यांनी काही आई-वडिलांना मुलांसाठी शत्रूसमान म्हटले आहे.
पुत्राश्च विविधैः शीलैर्नियोज्याः सततं बुधैः।
नीतिज्ञाः शीलसम्पन्ना भवन्ति कुलपूजिताः ।।
आई-वडिलांची कर्तव्ये
चाणक्य नीतीच्या दुसऱ्या अध्यायातील दहाव्या श्लोकात सांगितले आहे की, बुद्धिमान लोकांनी आपल्या मुलांना आणि मुलींना अनेक चांगल्या गुणांनी युक्त करावे. त्यांना चांगल्या कामांमध्ये गुंतवावे. कारण नीती जाणणारे आणि चांगल्या गुणांनी भरलेले सज्जन स्वभावाचे लोकच आपल्या कुटुंबात आदरणीय ठरतात.
या श्लोकात आचार्य चाणक्य सांगतात की, लहानपणी मुलांना जशी शिकवण दिली जाते, तसाच त्यांच्या आयुष्याचा विकास होतो. त्यामुळे आई-वडिलांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांना अशा मार्गावर चालवावे, ज्यामुळे त्यांच्यात हुशारीसोबतच चांगला स्वभावही विकसित होईल. गुणी व्यक्तींमुळेच कुटुंबाची शोभा वाढते.
माता शत्रु पिता वैरी येन बालो न पाठितः।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ।।
असे आई-वडील मुलांचे शत्रूसमान असतात
दुसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोकात सांगितले आहे की, जे आई-वडील आपल्या मुलांना शिकवत नाहीत, ते त्यांच्या मुलांचे शत्रूसमान असतात. कारण अशिक्षित मूल विद्वान लोकांच्या समूहात शोभत नाही आणि त्याचा नेहमी अपमान होतो. विद्वानांच्या समूहात त्याची अवस्था जशी हंसांच्या थव्यामध्ये बगळ्याची होते, तशीच होते.
आचार्य चाणक्य सांगतात की, फक्त मनुष्य म्हणून जन्म घेतल्याने कोणी बुद्धिमान होत नाही. त्यासाठी शिक्षण घेणे खूप आवश्यक आहे. चेहरा, शरीरयष्टी आणि रूप हे सर्व माणसांचे सारखेच असते, पण त्यांच्या बुद्धीमुळेच फरक ओळखता येतो. जसा पांढरा बगळा पांढऱ्या हंसांमध्ये बसून हंस बनू शकत नाही, तसाच अशिक्षित माणूस शिक्षित लोकांमध्ये बसून आदर मिळवू शकत नाही. त्यामुळे आई-वडिलांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांना असे शिक्षण द्यावे, ज्यामुळे ते समाजाची शोभा वाढवतील.
(टीप- या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
