Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी नीतीशास्त्रात मानवी जीवनाशी संबंधित अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत. चाणक्यांची नीती थोडी कठोर आणि अवघड वाटू शकते, त्यामुळे ती आचरणात आणणे काहीसे कठीण वाटते. मात्र, चाणक्य नीतीचे पालन केल्यास व्यक्तीला यश आणि प्रगती मिळू शकते, असे मानले जाते.

नीतीशास्त्रात आचार्य चाणक्यांनी आई-वडील, संतती, कुटुंब, शत्रू आणि धन यांसारख्या अनेक विषयांवर महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. एका श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी आई-वडील आणि मुलांमधील नात्याबाबतही आपले विचार व्यक्त केले आहेत. काही अशा परिस्थितींचे वर्णन त्यांनी केले आहे, ज्यामध्ये आई-वडील आपल्या मुलांसाठी शत्रूसमान ठरतात.

श्लोक:

‘माता शत्रुः पिता वैरी, येन बालो न पाठितः।

न शोभते सभामध्ये, हंसमध्ये बको यथा ॥’

श्लोकाचा अर्थ:

आचार्य चाणक्य म्हणतात की, जे आई-वडील आपल्या मुलांना शिक्षण देत नाहीत, ते मुलांचे शत्रूच ठरतात. कारण अशिक्षित मूल विद्वानांच्या समूहात सन्मान मिळवू शकत नाही. अशा मुलांचा अनेकदा अपमान होतो. विद्वानांच्या सभेत त्यांची अवस्था जशी हंसांच्या थव्यातील बगळ्याची असते, तशीच होते.

श्लोकाचा सार:

आचार्य चाणक्यांच्या मते, कोणताही व्यक्ती जन्मतः विद्वान किंवा सुशिक्षित नसतो. त्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक असते. चांगले रूप आणि रंग सर्वांकडे असतो, पण माणसाची खरी ओळख त्याच्या बुद्धिमत्तेमुळे होते. जसा पांढरा बगळा हंसांमध्ये राहून हंस बनू शकत नाही, तसाच अशिक्षित व्यक्ती सुशिक्षित लोकांमध्ये बसून मान-सन्मान मिळवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे, जेणेकरून त्यांना समाजात सन्मान मिळेल.

आई-वडिलांनी हे काम करावे:

श्लोक:

लालनाद् बहवो दोषास्ताडनाद् बहवो गुणाः।

तस्मात्पुत्रं च शिष्यं च ताडयेन्न तु लालयेत्।।

श्लोकाचा अर्थ:

जास्त लाड केल्यामुळे मुलांमध्ये अनेक वाईट सवयी आणि दोष निर्माण होतात. त्यामुळे वेळोवेळी त्यांना समज देणे किंवा रागावणे गरजेचे असते. यामुळे त्यांच्यात चांगले गुण विकसित होतात. आचार्य चाणक्यांच्या मते, मुलांना आणि शिष्यांना केवळ लाडाने वाढवू नये, तर आवश्यकतेनुसार त्यांना शिस्तही लावली पाहिजे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती चाणक्य नीतीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)