गेल्या काही काळापासून आपण हे सातत्यानं ऐकत आहोत की, भारत अतिशय झपाट्यानं शून्य दिवसाच्या जवळ जात आहे. शून्य दिवस म्हणजे असा दिवस ज्या दिवशी आपल्याकडील नैसर्गिक जलसाठे पूर्णपणे संपलेले असतील. हा भयानक दिवस पहायचा नसेल, तर पाण्याचा एकेक थेंब वाचवणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांनाच हा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे, एका मुक्या गायीने. सोशल मीडियावर सध्या या गायीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. ही गाय आपल्या शिंगांनी नळ उघडून पाणी पिते आणि पाणी पिऊन झाल्यावर व्यवस्थितपणे नळ बंद सुद्धा करते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक तहानलेली गाय आपल्या शिंगाने नळ खुला करण्याचा प्रयत्न करतेय. तहान लागलेली असताना सुद्धा ही गाय अतिशय समजदारीने वागतेय. जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत ही गाय आपल्या शिंगाने नळाची तोटी फिरवत पाणी काढण्याचा प्रयत्न करतेय. नळातून पाणी आल्यानंतर ही तहानलेली गाय घटघटा पाणी पिताना दिसून येतेय. पाणी पिऊन आपली तहान भागवून झाल्यानंतर कोणतेही क्षण वाया न घालवता या गायीने लगेचच नळाची तोटी बंद केली. हे खरंच पाहण्यासारखं आणि अनुकरण करण्यासारखं आहे.

Jamie Gnuman197 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर गायीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओला नेटकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. पाणी वाचवण्याचा हा संदेश गोमातेने आपल्याला दिला आहे, अशी प्रतिक्रिया काहीजणांनी दिली.

बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता असलेल्या माणसांनाही जे जमत नाही ते या गायीने करून दाखवलं आहे. पाणी वाया घालवू नका हा आपल्या पूर्वजाने दिलेला संदेश आपण किती मनावर घेणार हा मात्र प्रश्न आहे. भारतामध्ये अनेक शहरात पाणी टंचाई निर्माण होत असतानाच आपण या गायीचं अनुकरण करायला हवं आणि पाणी वाचवायलाच हवं.

या व्हिडीओज आज दुपारी ट्विटरवर शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला शेअर केल्यानंतर काही तास देखील उलटले नाहीत तर हा व्हिडीओ अगदी वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओवर नेटिझन्सनी पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या गायीवर कौतुकाचा वर्षाव सुरू केलाय. आपण अनेकदा असं म्हणतो, माणसांपेक्षा प्राणी बरे असतात. पण याची प्रचिती प्रत्यक्षात या व्हिडीओमधून मिळालीय. पाण्याचं महत्त्व माणसाला समजलेलं नाही, पण प्राण्यांना समजलेलं आहे. यातून माणसाने धडा घेणं गरजेचं आहे.