राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड पुकारल्याने राज्यामधील महाविकास आघाडी सरकार पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून बैठकीची सत्र सुरु झाली आहेत. एकीकडे शिवसेनेच्या बैठकींचं सत्र सुरु असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांसोबत बैठक घेण्याबरोबरच एकूण तीन बैठकी घेतल्या.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात? अजित पवार आणि शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्यं; म्हणाले, “अजित पवारांना…”

सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सरकारची स्थिती आणि आमदारांना विश्वासात घेण्यासाठी बैठकी आयोजित केल्या जात असतानाच भाजपाकडूनही हलचाली सुरु झाल्या आहेत. या घडामोडींदरम्यान ठाकरे सरकारमधील मंत्र्यांविरोधात मोर्चा उघडणारे भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे मागील अनेक दिवसांपासून प्ररारमाध्यमांसमोर आले नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असतानाच किरीट सोमय्यांनी ट्विटरवरुन देवेंद्र फडणवीसांसोबत हातात हात पकडलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोची पाच शब्दांची कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

किरीट सोमय्यांनी ट्विटरवरुन देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केलेत. हे फोटो विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईमधील शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘सागर’ बंगल्यावरील आहेत. “ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत,” अशी कॅप्शन या फोटोंना सोमय्या यांनी दिली आहे. इंग्रजीमधील ही पाच शब्दांची कॅप्शन सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून त्यावरुनच अनेकांनी या फोटोखाली कमेंट केल्यात. तसेच हे फओठओ शेअर करताना सोमय्यांनी, “देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची सागर बंगल्यावर भेट घेतली,” असंही म्हटलंय. या फोटोमध्ये किरीट सोमय्यांचा मुलगा नील आणि भाजपा नेते गिरीश महाजनसुद्धा फडणवीसांसोबत दिसत आहे.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदे प्रकरण : निलेश राणेंचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “५० वर्षांच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी…”

किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करण्याबरोबरच पत्रकार परिषदांमुळे मागील अडीच वर्षांमध्ये सातत्याने चर्चेत राहिले आहेत. सोमय्या यांनी अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबरोबरच नवाब मलिक, प्रताप सरकनाईक, भावना गवळी, अनिल देशमुख, यशवंत जाधव, अनिल देसाई यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ठाकरे सरकारनेही आयएनएस विक्रांत निधी संकलन घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांविरोधात चौकशी सुरु केलीय.